मुंबईतील पवई येथील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असलेल्या IIT मुंबईच्या कॅम्पसमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण संस्थेत मोठी खळबळ उडाली असून, त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. नमन अग्रवाल असं या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा राजस्थान राज्यातील रहिवासी होता. नमन आयआयटी बॉम्बेमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी मोठी स्वप्ने घेऊन तो मुंबईत आला होता, मात्र त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नमन अभ्यासात हुशार असल्याचे त्याच्या काही सहकाऱ्यांनी सांगितले आहे.
सदर धक्कादायक घटना पवईतील आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये असलेल्या हॉस्टेल क्रमांक 4 मध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नमनने हॉस्टेलच्या छतावरून उडी मारून स्वतःचे जीवन संपवलं. ही घटना घडताच तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी मोठा आवाज ऐकला आणि धाव घेतली. त्यांनी तातडीने आयआयटी प्रशासन आणि स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून नमनला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासापूर्वीच मृत घोषित केले. नमनने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे ठोस कारण शोधण्यासाठी पोलिसांनी आता नमनचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला आहे.




