शिमगोत्सव (Shimgotsav) म्हणजेच होळी आता काही दिवसांवर आली आहे. मुंबई (Mumbai) आणि उपनगरांमध्ये कामानिमित्त राहणारे लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी कोकणात जातात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने 2026 साठी विशेष जादा बससेवेची घोषणा केली आहे.
मुंबई महानगर परिसरातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरू नगर, सायन, ठाणे, बोरीवली, नालासोपारा आणि विठ्ठलवाडी या प्रमुख आगारांतून कोकणातील खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, महाड, लांजा, देवरुख आदी ठिकाणांसाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. 27 आणि 28 फेब्रुवारी 2026 पासून ही सेवा सुरू होईल. मुंबई सेंट्रलहून 27 फेब्रुवारीपासून कासे, खेड, गुहागर आणि दापोलीसाठी रात्रीच्या वेळेत बसेस धावतील. परळ आगारातून 28 फेब्रुवारीपासूनच दापोली, देवरुख आणि खेडसाठी सेवा उपलब्ध असेल. कुर्ला आणि सायनहून गुहागर, खेड आणि दापोलीकडे बसेस सोडल्या जातील. ठाणे CBS येथून महाड, खेड, साखरपा, गुहागर आणि दापोलीसाठी रात्री 9 ते 10 दरम्यान बसेस मिळतील तर बोरीवली आणि विठ्ठलवाडी येथूनही सकाळ आणि रात्रीच्या सत्रात जादा बससेवा सुरू राहणार आहे.
प्रवाशांना शासनाच्या योजनांचाही लाभ मिळणार आहे. ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा शिमगोत्सव अधिक सोयीस्कर ठरणार आहे.




