केस निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा आवर्जून केस धुतले जातात. एखाद्या फंक्शन किंवा इव्हेंटला जायचे असेल तेव्हा तर हेअरवॉश अधिकच गरजेचा ठरतो. शॅम्पू केल्यानंतर आपल्याला केस हवेत लहरणारे आणि चमकदार दिसावेत अशी अपेक्षा असते. मात्र अनेकदा तसे होत नाही.शॅम्पू आणि कंडिशनर केल्यानंतरही केस वाळल्यावर चिकटच राहतात किंवा धुतल्यानंतर काही वेळातच केस ऑयली होऊ लागतात. अशावेळी केसांवर घाण जास्त प्रमाणात चिकटते आणि हेअरस्टाईल करणेही कठीण होते. पण तुम्हाला माहिती आहे का की,केस चिकट का होतात आणि त्यावर उपाय काय आहेत?
केसांचा चिकटपणा दूर करण्यासाठी खास उपाय-
कडुनिंब किंवा शिकाकाई पाण्यात भिजत घालून उकळा आणि त्या पाण्याने केस धुवा. केस धुतल्यानंतर ताजे अॅलोवेरा जेल केसांना लावा. आठवड्यातून एकदा केसांमध्ये मुलतानी मातीचा लेप नक्की लावा. यामुळे स्कॅल्प स्वच्छ होतो, अतिरिक्त तेल शोषले जाते, केस आणि स्कॅल्पला पोषण मिळते.
केस चिकट होऊ नयेत यासाठी सल्फेट फ्री शॅम्पू वापरा आणि आठवड्यातून फक्त एकदाच केसांना तेल लावा. जास्त तेल लावणे टाळा. अनेक वर्षांपासून असे मानले जाते की, तेल लावल्याने केसांच्या मुळांना मजबुती मिळते, हे खरे आहे पण मर्यादित प्रमाणात. स्कॅल्पमध्ये आठवड्यातून एकदाच तेल लावा आणि त्यानंतर केस नीट स्वच्छ धुवा.




