नार्को टेस्टची मागणी, आरोप-प्रत्यारोपांनी राज्यातील राजकारण तापले
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर थेट हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. जरांगे पाटील यांनी दावा केला की, मुंडे यांनी स्वतःच्या कार्यकर्त्याद्वारे त्यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली होती. गोळ्या झाडून किंवा अपघात घडवून हत्या करण्याचा कट आखण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी “कांचन” नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला, जो मुंडे यांचा पीए किंवा कार्यकर्ता असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर कांचन उर्फ कल्पेश साळवे या व्यक्तीचे धनंजय मुंडेंसोबतचे अनेक फोटो आणि एक व्हिडिओ समोर आला असून, दोघे एकत्र बोलत असल्याचे त्यात दिसत आहे. या फोटोंमुळे आरोपांना आणखी उधाण आले आहे.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी देखील धनंजय मुंडेंवर जोरदार टीका करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. “मुंडे हे मोठे ब्लॅकमेलर आहेत. त्यांनी अनेक लोकांना ब्लॅकमेल करून मोठी संपत्ती जमा केली असून, त्यांच्या राज्यात गुन्हेगारी गट कार्यरत आहे,” असा आरोप डोंगरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “मुंडेंनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना ब्लॅकमेल केले आहे, म्हणूनच अजित पवार यांनीही त्यांच्यावर कारवाई केली नाही. अजितदादांचा ‘दादा’पण आता हरवला आहे,” अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर देखील निशाणा साधला.
या आरोपांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन करताना, “मुंडे यांची नार्को टेस्ट घ्यावी,” अशी मागणी पुन्हा केली आहे. तर धनंजय मुंडे यांनीही या आरोपांवर पलटवार करत स्वतःच नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे जाहीर केले. जरांगे पाटील यांनीही ते आव्हान स्वीकारल्याचे सांगत या वादाला आणखी धार दिली आहे.




