अशोक खरातच्या पापाचा घडा भरला; एसआयटी तपास जोरात, कोणीही सुटणार नाही!
कॅप्टन अशोक खरात याने आपल्या कथित आध्यात्मिक शक्तीचा गैरवापर करून महिलांचे जे शोषण केले आहे, त्या प्रकरणाने आता संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, “गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असा सज्जड इशारा दिला आहे. मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण प्रकरणाचे ‘वरिष्ठ स्तरावरून मॉनिटरिंग’ करत असून नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटी (SIT) या प्रकरणाचा मुळापासून तपास करत आहेत. सामाजिक दबावामुळे पीडित महिला सुरुवातीला पुढे येत नव्हत्या, मात्र आता सरकार त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन समोर आणत आहे. हे प्रकरण केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नसून महिलांच्या सन्मानाचा (Dignity) प्रश्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले आहे.
या प्रकरणाला आता राजकीय वळणही मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या काळात खरात याच्या ‘श्री शिवनिका संस्थान’साठी दारणा धरणातून तब्बल ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्याचा निर्णय ३१ जुलै २०२० रोजी घेण्यात आला होता. या शासन निर्णयाचा संदर्भ देत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार प्रहार केला. “कोणी कोणाला भेटलं यावरून कारवाई होत नाही, पण त्याला ताकद आणि पाणी कोणी पुरवले हे सर्वांना ठाऊक आहे,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना आरसा दाखवला. या प्रकरणात अनेकांनी खरातला मदत केल्याचे आरोप होत असून, “माझ्याकडे सर्वांचे पुरावे आहेत, पण सध्या पोलिसांना त्यांचे काम करू द्या,” असे म्हणत त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांची झोप उडवली आहे.




