पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या सहभागात मोठी वाढ; भावनिक ओढ आणि नात्यातील कंटाळवाणेपणा ठरतोय मुख्य कारण
सध्याच्या धावपळीच्या युगात मानवी नात्यांचे स्वरूप कमालीचे बदलताना दिसत आहे. एकेकाळी केवळ जोडीदार शोधण्यासाठी वापरली जाणारी डेटिंग ॲप्स आता विवाहबाह्य संबंधांचे (Extra Marital Affairs) केंद्र बनत चालली आहेत. सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे सोपे झाले असून, यातूनच नाती जुळण्याचे आणि तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः भारतात ‘ग्लिडन’ सारख्या एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग ॲप्सचा वापर करणाऱ्यांची संख्या तब्बल ४० लाखांच्या पुढे गेली असून, यात महिलांचा वाढता सहभाग हा समाजमनासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
या संदर्भात समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत विवाहबाह्य संबंधांसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांच्या संख्येत १४८ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे. या सर्वेक्षणातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, ७७ टक्के महिलांनी आपल्या पतीची फसवणूक करण्यामागे ‘वैवाहिक जीवनातील कंटाळवाणेपणा’ आणि ‘भावनिक जिव्हाळ्याची कमतरता’ हे मुख्य कारण असल्याचे सांगितले आहे. पुरुषांच्या बाबतीत हेच प्रमाण शारीरिक जवळीक मिळवण्याकडे अधिक झुकलेले दिसते. या ॲप्सवर लोक दिवसातील साधारण दीड तास घालवत असून, २५ ते ३० वयोगटातील तरुणी आणि ३० ते ४० वयोगटातील आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेले पुरुष (डॉक्टर, सीए, वरिष्ठ अधिकारी) एकमेकांशी संवाद साधण्याला प्राधान्य देत आहेत.
भारतीय समाजात नात्यांमधील संवाद हरवत चालल्याने अनेकजण डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘नावीन्य’ आणि ‘भावनिक आधार’ शोधत आहेत. ही वाढती आकडेवारी आधुनिक वैवाहिक जीवनातील बदलत्या मानसिकतेचे आणि आव्हानांचे दर्शन घडवते.




