अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या (FICCI) कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले. त्यापैकी त्याने एक प्रश्न विचारला ,“राजकारणातील तुम्ही स्टार आहात. कोणत्या चित्रपटाने किंवा व्यक्तीने तुम्ही प्रभावित झाला आहात का?” या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी मजेशीर उत्तर दिलं.या उत्तरात त्यांनी अनिल कपूर यांच्या ‘नायक’(Nayak) या चित्रपटाचा उल्लेख केला. इतकंच नव्हे तर ‘नायक’ने माझ्या समस्याही वाढवल्या आहेत, असंही ते म्हणाले.
“चित्रपट हे फक्त नेतृत्व गुणालाच नाही तर मानवी भावनांनाही प्रभावित करत असतात. मी आजवर अनेक चित्रपटांमुळे प्रभावित झालो. जर राजकारणाविषयी बोलायचं झाल तर, मी एका चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करू इच्छितो. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘नायक’. त्या चित्रपटाने मला प्रभावित तर केलंच, परंतु माझ्या समस्याही वाढवल्यात. नायक या चित्रपटात एका दिवसाचे मुख्यमंत्री बनून अनिल कपूर यांनी दिवसभरात इतकी कामं केली कि ते पाहून मी कुठेही गेलो तरी लोक म्हणतात, तुम्ही नायकसारखं काम करा. एका दिवसात ‘नायक’मध्ये अनिल कपूर किती कामं करतात, ते पहा. त्या चित्रपटाने जणू एक बेंचमार्कच तयार केलाय,” असं ते म्हणाले.
“जर तुम्ही एक दिवसासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक बनलात आणि त्या चित्रपटाचं नाव ‘महाराष्ट्र’ असेल, तर पहिला सीन तुम्ही कोणता चित्रित कराल?”, त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रावर चित्रपट बनत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सिन मी पहिला चित्रित करेल.ते राज्याभिषेकासाठी बसलेले असतील आणि इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर पुन्हा एकदा स्वराज्याचं निर्माण.. हाच तो सीन असेल.” त्यानंतर अक्षयने त्यांना राजकारणातील खरे हिरो कोण वाटतात, असा हि प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ (Narendra Modi)असं उत्तर दिलं.




