अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत, मात्र काँग्रेसने उमेदवार दिल्याने निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती, परंतु काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवल्याने समीकरणे बदलली आहेत. सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संवाद साधला, तर रोहित पवारांनीही मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, सपकाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, उमेदवारी मागे घेण्याबाबतचा अंतिम निर्णय हा वैयक्तिक नसून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल. सध्यातरी काँग्रेसने आपली ‘वेट अँड वॉच’ भूमिका कायम ठेवल्याने बारामतीचा गड बिनविरोध होणार की लढत होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




