राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची युती होण्याची शक्यता आता जवळपास निश्चित झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये जिव्हाळ्याचे संबंध दृढ झाले असून, मागील 20 वर्षांत एकमेकांच्या घरी जाणे-येणे बंद होते, ते या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरु झाले आहे.
आज शिवतीर्थ येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब आणि मनसेकडून बाळा नांदगावकर उपस्थित होते. बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आज चर्चा झाली, काही बाबी ठरल्या आहेत. पुन्हा एक बैठक घेऊन पुढील एक-दोन दिवसांत युतीची औपचारिक घोषणा केली जाईल. जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत त्याबाबत बोलणे योग्य नाही.”
मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरे गटासाठी महत्त्वाची असून, मागील 25 वर्षांपासून शहरावर ठाकरे गटाची सत्ता होती. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर ही मुंबई महापालिका निवडणूक विशेष लक्ष वेधून घेते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र येणे म्हणजे मुंबई महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकरणार याबाबत उत्सुकता वाढवते.
बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी काँग्रेससोबत युतीबाबत स्पष्ट केले की, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यामुळे आजच्या चर्चेत काँग्रेसचा विषय नव्हता. “आम्ही फक्त शिवसेना (ठाकरे) सोबत युतीबाबत चर्चा केली आहे,” असे त्यांनी सांगितले.
शिवसेना (ठाकरे) अद्याप महाविकास आघाडीचा घटक असल्याने, मनसेसोबत युती करून महाविकास आघाडी अभेद्य राहावी, असा प्रयत्न चालू आहे. तसेच, हिंदूत्वाबाबत बाळासाहेब ठाकरे कुटुंबाला कोणत्याही बाह्य व्यक्तीने शिकवू नये, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.




