उपसभापतींच्या मौनावर सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केले अस्वस्थ करणारे सवाल
अशोक खरात या भोंदू बाबाच्या लैंगिक शोषणाचे काळे कारनामे समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी थेट विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. खरातच्या संपर्कात अनेक बड्या हस्ती असल्याच्या चर्चेत आता गोऱ्हे यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तृप्ती देसाई यांच्या दाव्यानुसार, नीलम गोऱ्हे या खरातला जुन्या काळापासून ओळखतात. आमदारकी आणि मंत्रिपदाचे भविष्य जाणून घेण्यासाठी नाशिकमधील ‘एक्स्प्रेस इन’ हॉटेलमध्ये या दोघांच्या गुप्त भेटी झाल्या होत्या, असा खळबळजनक खुलासा देसाई यांनी केला आहे. “नेहमी महिलांच्या प्रश्नावर तातडीने प्रेस नोट काढणाऱ्या आणि पीडितांना भेटणाऱ्या नीलम ताई एवढं मोठं प्रकरण होऊनही अधिवेशनात गप्प का?” असा टोकदार सवाल देसाई यांनी विचारला आहे. १५० हून अधिक व्हिडिओ समोर येऊनही जबाबदार पदावर असलेल्या महिलेने मौन बाळगणे संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात यापूर्वीच रुपाली चाकणकर यांना आपली पदे गमवावी लागली आहेत, अशा स्थितीत नीलम गोऱ्हे यांच्यावरील या आरोपांमुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. “खरात जरी परिचयाचा असला, तरी त्याचे पाप समोर आल्यावर त्याच्याविरुद्ध आवाज उठवणे ही तुमची जबाबदारी होती,” अशा शब्दांत देसाईंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता या आरोपांवर नीलम गोऱ्हे काय स्पष्टीकरण देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




