जुन्या वादातून तरुणावर हल्ला,उपचारादरम्यान मृत्यू!
अमरावती (Amravati) जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या विलास नगर येथील संविधान चौकात दि 19.11.2025 बुधवारी रात्रीच्या सुमारास रक्तरंजित घटना घडली. जुन्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. घरबांधकामातील गिट्टी उचलण्यात व्यस्त असलेल्या युवकांवर चौघांनी अचानक हल्ला करण्यात आला असून यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय फिर्यादी ममता रविंद्र पाटणकर व यश पाटणकर हे दोघे घरासमोर असलेली गिट्टी फावड्याने टोपल्यात भरत असताना अचानक प्रेम बोबडे, स्वराज उर्फ मिरची उइके, खुशाल यादव हे दुचाकीवरून आले. त्यांनी अचानक यश पाटणकर याच्यावर चाकूने हल्ला चढविला. आरोपींनी यशच्या छातीवर व पाठीवर चाकूने वार केला. यानंतर ते दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान यश हा जीव वाचवविण्यासाठी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना काही अंतरावर तो पुन्हा कोसळला. यश पाटणकर याला जखमी अवस्थेत नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, अति रक्तस्त्राव झाल्यामुळे यश पाटणकरचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. आरोपीच्या शोधात तात्काळ पोलीस पथक रवाना करण्यात आले. या घटनेत गाडगे नगर पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रिन्स भागचंद श्रीवास (वय 18 वर्षे, रा. विलास नगर) याला शहर गुन्हे शाखा पथकने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी फिर्यादी ममता रविंद्र पाटणकर यांच्या तक्रारी वरून 20 नोव्हेंबर रोजी आरोपी विरुद्ध कलम 103(1),61(2),3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन आरोपी मुलासोबत मृतक यश पाटणकरचे जुने वाद असल्यामुळे त्याची हत्या (Murder) करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल आहे.




