MeToo आरोपांनंतर अभिनय विश्वापासून दूर; जुना मित्र राजेश पुरी यांनी सांगितली सध्याची अवस्था
आलोक नाथ यांचं नाव घेताच आजही अनेकांच्या डोळ्यासमोर प्रेमळ, संस्कारी आणि कुटुंबवत्सल ‘बाबूजी’ची प्रतिमा उभी राहते. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत त्यांनी वडिलांच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र, काही वर्षांपासून आलोक नाथ कुठे आहेत, काय करत आहेत याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
MeToo चळवळीच्या काळात आलोक नाथ यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आणि त्यानंतर ते अचानक सर्वांसमोरून गायब झाले. या आरोपांनी संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का दिला होता. त्यानंतर आलोक नाथ यांनी स्वतःला लाईमलाईटपासून पूर्णपणे दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.
आता त्यांच्या बालपणीच्या मित्राने आणि अभिनेता राजेश पुरी यांनी आलोक नाथ यांच्या सध्याच्या परिस्थितीबाबत भाष्य केलं आहे. राजेश पुरी म्हणाले, “दिल्लीहून मुंबईत आम्ही दोघं एकाच ट्रेनने आलो होतो. संघर्षाचे दिवस, यश मिळवण्याचा प्रवास सगळं आम्ही एकत्र पाहिलं. पण आरोपांनंतर आलोक पूर्णपणे कोलमडून गेले.”
ते पुढे म्हणाले, “मी अनेकदा त्यांना भेटायचा आग्रह करतो. ते होकार देतात, पण नंतर संपर्क होत नाही. कधी बोलणं झालं, तर जुन्या आठवणींमध्ये रमतो. मात्र, एक प्रतिभावान अभिनेता अशा पद्धतीने बाजूला पडलेला पाहून वाईट वाटतं.”
राजेश पुरी यांच्या मते, आलोक नाथ सध्या कोणत्याही अभिनयाच्या ऑफर स्वीकारत नाहीत. “ते नेहमी म्हणतात की घरीच काहीतरी काम करत आहेत, पण नेमकं काय करतात याची माहिती नाही. बहुधा सध्या त्यांच्या हातात कोणतंही काम नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘हम आपके हैं कौन’, ‘विवाह’, ‘हम साथ साथ हैं’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून आणि ‘बुनियाद’, ‘विदाई’सारख्या मालिकांमधून आलोक नाथ यांनी वडिलांची भूमिका अजरामर केली. त्यामुळेच ते ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला हिरो म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची त्यांची इच्छा होती, मात्र प्रेक्षकांनी त्यांना बाबूजीच्या भूमिकेतच अधिक प्रेम दिलं.
आपल्या कारकिर्दीत आलोक नाथ यांनी जवळपास ३००हून अधिक चित्रपट आणि १५ पेक्षा जास्त दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलं आहे. आज मात्र ते चित्रपटसृष्टीपासून दूर, एकाकी आयुष्य जगत असल्याचं चित्र समोर येत आहे.




