दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानाला एक नवं वळण मिळाले आहे. ज्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या विमानाने अजित पवारांनी प्रवास केला होता, त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके अत्यंत सुमार दर्जाची होती, अशी माहिती समोर आली आहे. युरोपियन हवाई नियामक संस्था EASA (European Union Aviation Safety Agency) ने या कंपनीवर एक वर्षापूर्वीच बंदी घातली होती, तरीही ही कंपनी भारतात सेवा कशी देत होती? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत या कंपनीच्या एका ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात झाला होता. या अपघाताबाबत EASA ने वारंवार तांत्रिक माहिती मागवूनही कंपनीने ती पुरवली नाही. ऑक्टोबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत EASA ने कंपनीला ५ वेळा स्मरणपत्रं पाठवली. तरीही कंपनीने अंतर्गत चौकशी अहवाल देण्यास नकार दिला आणि सुरक्षा मानकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
कंपनीच्या याच असहकार्यामुळे युरोपियन हवाई क्षेत्रात या कंपनीच्या उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, युरोपियन युनियनने या बंदीच्या आदेशाची प्रत भारताच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाला (DGCA) पाठवली होती. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कंपनी ‘धोकादायक’ ठरवण्यात आली होती, तर महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी या कंपनीच्या विमानाला परवानगी कशी मिळाली? या प्रश्नामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणावर अद्याप डीजीसीएनं प्रतिक्रिया दिली नाही.




