अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्र सुन्न; गौतमी पाटील म्हणते, “दादांना कधीही विसरता येणार नाही”
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे सभेसाठी जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांनी अखेरचा श्वास घेतला आणि महाराष्ट्राने आपला एक बुलंद नेता गमावला.
दादांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे फोटो, व्हिडीओ आणि भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिनेही या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एका अलीकडील मुलाखतीत गौतमी पाटीलला (Gautami Patil) अजित पवार यांच्या निधनाबाबत विचारण्यात आलं असता ती भावूक झाली. “माझ्या आईकडून मला ही बातमी समजली. टीव्हीवर बातमी पाहिल्यावर विश्वासच बसला नाही. दादांच्या बाबतीत असं काही घडेल, असं कधी वाटलं नव्हतं,” असं ती म्हणाली.
गौतमी पुढे म्हणाली, “मी दादांना कधीही प्रत्यक्ष भेटले नाही. पण त्यांनी नेहमी माझं कौतुक केलं, मला पाठिंबा दिला. त्यांनी माझ्याबद्दल दोन शब्द जरी बोलले, तरी ते माझ्यासाठी खूप मोठं होतं. त्या दोन शब्दांनीच त्यांनी माझं मन जिंकलं.”
आपली भावना व्यक्त करताना गौतमी म्हणाली की, “आजही मी या धक्क्यातून सावरलेली नाही. दादा कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे. कुणीही काम घेऊन गेलं, तर ते नक्की पूर्ण होईल, असा सर्वांचा विश्वास होता. महाराष्ट्र कधीही त्यांना विसरू शकणार नाही. ते संपूर्ण राज्याचे लाडके नेते होते आणि कायम राहतील.”
दरम्यान, बुधवारी सकाळी ८.४५ वाजता झालेल्या या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह खासगी सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट सुमित कपूर आणि सह-पायलट शांभवी पाठक यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या अपघातानंतर महाराष्ट्र अद्यापही धक्क्यातून सावरलेला नाही. एक अनुभवी, लोकप्रिय आणि निर्णायक नेतृत्व हरपल्याची भावना राज्यभर उमटताना दिसत आहे.




