अंडर-१९ संघातून बाद होण्यापासून ते १३०० कोटींच्या क्लबपर्यंत; काश्मिरी पंडिताच्या मुलाने ‘सर्जिकल स्ट्राईक’ने बदलले भारतीय सिनेमाचे नशीब
काही वेळा आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळत नाही, कारण नशिबाने आपल्यासाठी त्याहूनही मोठे काहीतरी राखून ठेवलेले असते. हे विधान दिग्दर्शक आदित्या धर यांच्या आयुष्याला तंतोतंत लागू होते. १९८३ मध्ये दिल्लीतील एका काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या आदित्यचे स्वप्न भारतीय क्रिकेट संघासाठी ‘स्पिनर’ म्हणून खेळण्याचे होते. मात्र, जेव्हा अंडर-१९ वर्ल्ड कपच्या संघात त्याची निवड झाली नाही, तेव्हा त्याचे हे स्वप्न भंगले. इतकेच नाही तर, लहानपणी ‘डिस्लेक्सिया’ (वाचण्यास त्रास होणे) सारख्या आजारामुळे १५० पानांची स्क्रिप्ट वाचणेही ज्याच्यासाठी कठीण होते, त्यानेच पुढे जाऊन भारतीय सिनेसृष्टीची पटकथा बदलली. २००६ मध्ये मुंबईत पाऊल ठेवल्यानंतर सुरुवातीची १०-१२ वर्षे त्याने प्रचंड संघर्ष केला; कधी गीतकार म्हणून तर कधी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडचे बारकावे शिकले.
आदित्यच्या प्रवासातील सर्वात मोठे वळण २०१६ मध्ये आले. करण जोहरच्या ‘रात बाकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तो करणार होता, पण उरी येथील दहशतवादी हल्ल्यामुळे आणि पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीमुळे हा चित्रपट बंद पडला. ज्या घटनेने त्याचे काम हिरावले, त्याच घटनेला त्याने आपली ताकद बनवले. उरी हल्ल्याचा सखोल अभ्यास करून त्याने ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट बनवला, ज्याने त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आणि ‘हाऊज द जोश’ हा नारा घराघरात पोहोचवला. त्यानंतर त्याने राजकारण आणि वास्तववादाची जोड देऊन ‘आर्टिकल ३७०’ आणि आताचा गाजलेला ‘धुरंधर’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाने १३०० कोटी, तर दुसऱ्या भागाने अवघ्या ७ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार करून बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केले आहेत.




