मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून रेल्वे स्थानके आणि रस्त्यांवर प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर एक अनोखी आणि धक्कादायक घटना घडली. स्थानकावरील एका रेल्वे इंजिनमध्ये अजगराचे पिल्लू आढळून आल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधला. सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून काळजीपूर्वक शोधमोहीम राबवली आणि इंजिनच्या आतील भागात अडकलेल्या अजगराच्या पिल्लाला सुरक्षित बाहेर काढले. या संपूर्ण बचावकार्यादरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वन्यजीव आणि सर्प सुरक्षित आश्रयाच्या शोधात शहरातील मानवी वस्तीकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वीही बीकेसी परिसरात विषारी घोणस जातीचे तीन साप आढळल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




