आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच एक बैठक झिम्बाब्वेची राजधानी हरारे (ICC Meeting) येथे आयोजित केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पार पडल्यानंतर ही पहिलीच बैठक होती. आयसीसीच्या या क्वार्टरली बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नकवी गैरहजर राहिले. काही वैयक्तिक कामांमुळे बैठकीला हजर राहता आले नाही असे नकवी यांनी कळवल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. परंतु, नकवी गैरहजर राहण्यामागे खरं कारण वेगळंच असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
खरंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल सामन्यानंतर ट्रॉफी देण्यासाठी पीसीबीचा कोणताही अधिकारी स्टेजवर उपस्थित नव्हता. फायनल सामना टीम इंडियाने जिंकला होता. भारतीय संघामुळेच ही स्पर्धा पाकिस्तानला हायब्रीड मॉडेलवर आयोजित करावी लागली होती. फायनल सामना दुबईत होता. त्यामुळे पाकिस्तान बोर्डाचा एकही अधिकारी हजर नव्हता. या प्रकाराची तेव्हा खूप चर्चा झाली होती. इंडिया टुडेतील वृत्तानुसार पीसीबीने यामागचे कारणही विचारले होते. परंतु, आयसीसीने याचे काहीच उत्तर दिले नव्हते.
आयसीसीच्या या बैठकीत पाकिस्तानच्या वतीने सुमैर अहमद उपस्थित होते. अहमद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी आहेत. तरीही बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांची गैरहजेरी त्यांच्या नाराजीचे संकेत देत असल्याची चर्चा होती. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा (Champions Trophy 2025) पाकिस्तानात आयोजित करण्यात आली होती. टीम इंडियाला पाकिस्तानात जाऊन खेळण्याची परवानगी भारत सरकारने दिली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानला हायब्रीड मॉडेलवर स्पर्धा भरवावी लागली. भारतीय संघाचे सर्व (Team India) सामने दुबईत आयोजित करण्यात आले होते.
सुरुवातीला पाकिस्तान बोर्डाने (Pakistan Cricket Board) नकार दिला होता. पण नंतर दबाव वाढल्याने बोर्ड तयार झाले. परंतु, त्यांच्याकडून काही अटी ठेवण्यात आल्या. या अटी स्वीकारण्यात आल्या. या स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन करत विजय मिळवला. या स्पर्धेत रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार होता.