संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी (Santosh Deshmukh Case) संबंधित एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारण्यासाठी चार जीवघेण्या शस्त्रांचा वापर करण्यात आला असा उल्लेख परीक्षण अहवालात करण्यात आला आहे. गॅसचा पाइप, पाईपाचा चाबूक, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाइपाचा यात समावेश होता. या हत्यारांच्या सहाय्याने संतोष देशमुख यांना आरोपींनी अमानुष मारहाण केली. दरम्यान, हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
चारही हत्यारे कराड गँगने तयार केली आहेत असा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. या हत्यारांच्या मदतीने संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या शरीरावर 150 जखमा आढळल्या होत्या. इतकी अमानुष मारहाण त्यांना झाली होती. आरोपींनी याआधीही याच हत्यारांना अन्य व्यक्तींना देखील मारहाण केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख् यांना मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे. यामध्ये गॅस पाइप, पाइपाचा चाबूक, बांबूची काठी, लोखंडी पाइप या हत्याराने देखील देशमुख यांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींविरुद्ध मकोका दाखल करण्यात आला आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि त्या संबंधी दोन प्रकरणांत सीआयडीने मागील महिन्यात बीड येथील न्यायालयात 1200 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
Santosh Deshmukh नेमकं प्रकरण काय
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आले होते. यानंतर त्यांना अमानुष मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली. त्यांच्यावर मकोका लावण्यात आला. आता हे सर्व आरोपी कोठडीत आहेत. यातील एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे.