तनिषा भिसे प्रकरणात मृ्त्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच (Deenanath Mangeshkar Hospital) दोषी असल्याचा ठपका सरकारी कमिटीने ठेवला आहे. गर्भवती महिलेला तत्काळ दाखल करून न घेणे ही मोठी चूक असल्याचा सरकारी समितीने अहवाल आरोग्य विभागाला सादर केला आहे. पैशांमुळे योग्य वेळेत उपचार मिळाले नाही, म्हणून तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यानंतर संपूर्ण राज्य भरात मोठी संतापाची लाट पसरली आहे. निदर्शने, आंदोलनं केली जात असल्याचं वृत्त समोर येतंय.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन यावर म्हणतंय की, मृत महिलेच्या कुटुंबियांकडून आमची बदनामी झालेली आहे. सरकारने यासंदर्भात पाच सदस्यीय समिती नेमली होती. त्यांनी देखील गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ (Government Committee On Tanisha Bhise Case) दाखल करून घेतले नाही, ही दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचीच मोठी चूक असल्याचं सांगितलं आहे.
तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना समोर येताच, पुणे शहरात मोठा संताप व्यक्त केला जात होता. अनेक पक्ष संघटनांनी यासंदर्भात आंदोलन केली. याची राज्य सरकारने दखल घेत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. याच पार्श्वभूमीवर समितीच्या अध्यक्षांनी आरोग्य विभागाला प्राथमिक अहवाल सादर केलाय. तर येत्या दोन दिवसांमध्ये सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती मिळतेय.
सरकारने नेमलेल्या समितीने रूग्णाशी संबंधित सगळे कागदपत्रे, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल आणि संबंधित सर्व बाबींचा अभ्यास केला. तर दुसरीकडे रूग्णालयाने सुरूवातीपासूनच सर्व आरोप फेटाळून लावले होते. मृत महिलेच्या नणंद प्रियांका पाटे यांनी देखील माध्यमांसमोर वस्तुस्थिती मांडली होती. भिसे कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याप्रकरणाची सविस्तर माहिती दिली होती. आमचा रोष केवळ एका व्यक्तीवर नसून ढिसाळ व्यवस्थेवर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. सोबतच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही, याची देखील खबरदारी घेतली जावी असं देखील भिसे कुटुंबानी म्हटलंय.