10.6 C
New York

Raj Thackeray : राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यामध्ये कोणाला लक्ष्य करणार?

Published:

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर संघटनात्मक बांधणी आणि फेरबदलावर लक्ष केंद्रित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा रविवारी शिवाजी पार्क मैदानावर होत आहे. राज्यात सध्या मुघल बादशाह औरंगजेबपासून ते विनोदवीर कुणाल कामारापर्यंतचे विषय गाजत आहेत. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे (Raj Thackeray) कुणाचा समाचार घेतात याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. (what will raj thackeray say at mns gudipadwa melava)

छावा चित्रपटाच्या यशानंतर औरंगजेब आणि त्याच्या कबरीचा विषय चर्चेला आला. या दरम्यान अभिनेता राहुल सोलापूरकर आणि नागपूरमधील पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक विधाने केली. ऐन विधिमंडळ अधिवेशनात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करून नवा वाद ओढवून घेतला. हा वाद शांत होत असताना आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा समोर आला आहे. या साऱ्यांचा समाचार राज ठाकरे आपल्या आपल्या भाषणात घेऊ शकतात.

बिहार आणि उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने रमजानच्या महिन्यात ‘सौगात – ए -मोदी ‘ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. मनसेने हिंदुत्ववादी भाजपला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपने आता ‘सौगात – ए -मोदी ‘ कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली हिंदुत्ववादी भूमिका काहीशी सौम्य केल्याची चर्चा आहे. यावरून राज ठाकरे भाजपला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. याशिवाय अलीकडे राज्यात काही ठिकाणी परप्रांतीयांकडून मराठी द्वेषाच्या घटना उघडकीस आल्या. या घटनांवरून राज ठाकरे मराठी द्वेष्ट्यांना ठाकरी शैलीत सुनावण्याची शक्यता आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात सरकारच्या वतीने आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, अशी भूमिका घेण्यात आली. शिवाय निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देणाऱ्या महायुतीने आता शेतकऱ्यांना पीककर्ज फेडण्याचा सल्ला दिला आहे. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा राजीनामा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूर शहरात घडलेली दंगल आदी मुद्द्यांवरून राज ठाकरे आज सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray निवडणुकीनंतर प्रथमच मनसैनिकांशी संवाद

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला पराभवाचा मोठा फटका बसला. पक्ष स्थापनेनंतर प्रथमच विधानसभा निवडणुकीत भोपळा फोडण्यात मनसेला अपयश आले. खुद्द राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीममधून पराभूत व्हावे लागले. विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे प्रथमच सर्वसामान्य मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते निवडणूक निकालावर भाष्य करण्याची शक्यता आहे. निवडणुकीतील पराभव पचवून राज ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणी आणि पक्षातील फेरबदलावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन अपेक्षित आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img