राहुरी (Rahuri) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना अतिशय निंदनीय असून या घटनेचा तीव्र शब्दात आपण निषेध करीत आहोत.या घटनेतील आरोपींना शोधून काढण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास देण्यात आल्या आहेत.नागरीकांच्या भावना तीव्र होणे स्वाभाविक असले तरी शांतता राखण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले आहे.
घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सर्व माहीती आपण जाणून घेतली. स्थानिक पातळीवर नागरीकांच्या भावना लक्षात घेवून आ.शिवाजीराव कर्डीले यांनी तातडीने येवून सर्व परीस्थिती समाजावून घेतली आहे. या घटनेतील आरोपीनी केलेले कृत्य सर्व समाज मनाच्या भावना दुखवणारे असल्याने त्यांची गय केली जाणार नाही. पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. असं विखे पाटील म्हणाले .
तसेच आरोपींच्या शोधासाठी तपास पथक वाढविण्याच्या सूचनाही देतानाच जिल्ह्यात पुन्हा असे कृत्य करण्याची कोणी हिंमत करणार नाही अशी कठोर कारवाई करण्याबाबत पोलीसांना सांगण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
या घटनेच्या विरोधात हिंदूत्ववादी संघटना तसेच सकल हिंदू समाजाने रस्त्यावर येवून व्यक्त केलेल्या भावनांची गंभीर दखल सरकारने घेतली असून नागरीकांनी शांतता बाळगावी असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.