राज्यात एकीकडे सूर्य आग ओकतोय, तर दुसरीकडे मुसळधार पावसाची शक्यता (Heavy Rain) वर्तवली जातेय. राज्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे आहेत. आयएमडीने (IMD Alert) राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. अचानक वातावरणामध्ये मोठा बदल झालेला दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज (Weather Update) आहे, या पार्श्वभूमीवर काळजी घेणं गरजेचं आहे.
राज्यामध्ये पुन्हा एकदा सायक्लोनिक सर्क्युलेशनसारखी स्थिती निर्माण झाली, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. याचा परिणाम म्हणून राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी शक्यता आयएमडीने वर्तवली (Maharashtra Weather Update) आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील काही जिल्ह्यांना 29 आणि 30 मार्च रोजी अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. तर राज्यातील इतर काही भागांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे. सिंधूदुर्ग आणि रत्नागिरीत पावसाचा इशारा आहे, तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे आणि इतर काही भागांत ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आलाय. दरम्यान महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर काही राज्यांत देखील या काळामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची देखील शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आयएमडीने अलर्ट जारी केलाय.