मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे तसेच यासाठी पुरावा म्हणून त्या संभाषणाचा पेनड्राइव्ह देखील सभापतींकडे सादर केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉपीमध्ये लोटस 24 नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत (Mumbai) आयपीएलसाठी आल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली. राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील घोटाळे, मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे घोटाळे सादर करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाढे काढले. तसेच राज्यातील आर्थिक स्थिती रसातळाला जात असल्याचे म्हणत दानवे यांनी सरकारच्या कार्यपध्दतीवर निषेध व्यक्त केला.
Ambadas Danve क्राईम इन महाराष्ट्र अहवाल प्रसिद्ध करा
राज्याने गेल्या दोन वर्षांपासून क्राईम इन महाराष्ट्र अहवाल प्रसिध्द केला नाही. राज्यात 564 विविध गुन्हे दाखल झाले असून दंगलीच्या घटना घडल्या आहेत. नागपुर, पुणे,संभाजीनगरमध्ये बलात्कराच्या घटनांचा आलेख वाढला असून दररोज 22 बलात्कार, 45 विनयभंगाच्या घटना घडत आहेत. कायद्याचा धाक नसल्यामुळे या सर्व घटना घडत असल्याचे दानवे म्हणाले. सरकारने सुरु केलेले मिशन शक्ती अभियानात आतापर्यंत 22 टक्के रक्कम खर्च झाली असून ही दुर्देवी बाब असल्याचेही ते म्हणाले. कारागृहाची बंदीची क्षमता 27 हजार 114 बंदी असताना 43 हजार बंदी कोंबून ठेवले आहेत. राज्यात 51 हजार कोटी रुपयांची फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुन्हयांच व सायबर गुन्ह्याच प्रमाण वाढल असून ते रोखण्यासाठी सायबर सेल प्रभावी होण्याची आवश्यकता आहे. असं देखील ते म्हणाले.
अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून चोरी करून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. बीड मस्साजोग सरपंच हत्येतील आरोपी अद्याप पकडला जात नाही. सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू मानव आयोगाच्या अहवालात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. मंत्र्यांचा परदेशात चाललेल्या मुलाच विमान वळवलं जातं परंतु सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करू शकत नाही अशा शब्दांत दानवे यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड काढली जात असेल तर सर्वसामान्य मुलीची काय स्थिती असेल, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला.
अहमदाबादमधील सुधीर कोठडिया नावाच्या व्यक्तीने 2 हजार कोटी रुपये डिजिटल पध्दतीने जमवून हवाला मार्फत ते विदेशात पाठवले. यातील गुंतवणूकदारांची फसवणूक केली, याबाबत पराग अशोककुमार शहा यांनी तक्रार केली. मात्र याबाबत पुणे की नारायण गावात गुन्हा दाखल व्हायला होता मात्र ठाण्यात पोलीस उपायुक्तांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त गुन्हा दाखल करतात.
याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली. सिडको योजनेतील खरपुडीची 247 हेक्टर क्षेत्र जमीन शेतकऱ्यांकडून सतीश अग्रवाल, कृष्णकुमार गोयल, राधेश्याम, चिप्पा रखमाजी आदींनी विकत घेतली. 18 जून 2008 ला हे प्रदूषित क्षेत्र म्हणून घोषित केले त्यानंतर आर्थिक साहाय्यता नसल्यामुळे हा प्रकल्प रद्द केला होता. यात सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी डी एसके लीगल सर्व्हिसेसची अवैध नेमणूक करून देयके दिल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चौकशीची मागणी केली.