राज्यातील उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना गारवायुक्त प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी दर महिन्याला 300 नव्या वातानुकूलित बस सेवेत दाखल होणार आहेत.
ST Bus गावाकडे जाणाऱ्यांसाठी थंडगार प्रवासाची सोय
उन्हाळी सुट्ट्या सुरु होताच अनेक चिमुकल्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना गावी जाण्याचे वेध लागतात. या काळात एसटी महामंडळावर प्रचंड प्रवासी लोटतो. यंदा या वाढलेल्या मागणीला सामोरे जाण्यासाठी एसटी महामंडळाने 872 वातानुकूलित शिवशाही बसेस मार्गावर धावणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये कोकण, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, नागपूर, जळगाव, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश असेल.
मुंबई सेंट्रल आणि परळ आगारातूनही विशेष अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत परवडणाऱ्या दरात आणि आरामदायक प्रवासाची संधी या माध्यमातून मिळणार आहे. अशा प्रकारे एसटी महामंडळाला उत्पन्नातही चांगली भर पडण्याची शक्यता आहे.
ST Bus दर महिन्याला 300 नव्या एसी बस प्रवासात सहभागी होणार
राज्य शासनाने 2640 नवीन एसी एसटी बसेस लवकरच सेवा पुरवण्यासाठी टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक महिन्यात 300 नव्या बसेस ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे गावागावांतील नागरिकांना आता वातानुकूलित सुविधांसह प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे प्रवासी अधिकाधिक एसी बसच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरणार आहे. शिवाय शाळांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई आणि उपनगरातून कोकण व इतर भागांत जाणाऱ्या चाकरमान्यांनाही या सुविधा दिलासा देतील.