महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका बैठकीत केले आहे. त्याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठविले आहे. जयकुमार रावल यांच्या बँकलुटीचे प्रकरण आपल्याकडे पाठवले आहे. (Sanjay Raut) महाराष्ट्रावर वाढलेला भ्रष्टाचाराचा भार हलका कराल याची खात्री आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी काल, सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना जयकुमार रावल यांच्यावर शरसंधान केले होते. जयकुमार रावल यांनी रावल को ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. हे प्रकरण मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार आहे. त्यांना विचारणार आहे की, तुमच्याजवळच्या मंत्र्यांना लोकांच्या पैशाचा भ्रष्टाचार करण्याचा परवाना दिला आहे का? असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार त्यांनी फडणवीस यांना पत्र पाठविले असून ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी ते शेअरही केले आहे.
Sanjay Raut संजय राऊत म्हणतात –
राजकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रातील अनेक सहकारी तसेच नागरी बँकांचे वाटोळे झाले आणि त्यात सामान्य ठेवीदारांचे अतोनात नुकसान झाल्याचे रोज समोर येत आहे. जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेल्या न्यू इंडिया बँकेतही अशाच मनमानी, बेकायदेशीर पद्धतीने कर्जवाटप झाल्याने हजारो ठेवीदारांचे नुकसान झाले आणि त्यातील आरोपी मुंबई पोलिसांच्या अटकेत आहेत.
दोंडाईचा जनता सहकारी बँक (कै. दादासाहेब रावल जनता सरकारी बैंक) या बँकेत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली. बिगर गॅरंटीचे कर्जवाटप, कोणतीही गॅरंटी न घेता 98 कोटींचे कर्जवाटप आपल्या जवळच्याच नातेवाईकांना बँकेच्या राजकीय मालकानी दिले. इतकेच नव्हे तर, बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेर गुजरातमधील नातेवाईकांनाही कोट्यवधी रुपये दिले. हे गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य आपल्या मंत्रिमंडळातील जयकुमार रावल यांनी केले. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास राजकीय दबावामुळे होऊ शकला नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना झाली आणि चौकशी अहवालानुसार मंत्री जयकुमार रावल हे बँक घोटाळा प्रकरणात आरोपी क्रमांक तीन आहेत. या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून रावल हे इतर 55 आरोपींसह फरारी झाले. याच काळात यातील काही आरोपींनी ‘एसआयटी’ तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आपल्याकडून म्हणजेच, तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा तपास सीआयडीकडे सोपवण्यास भाग पाडले.
बँकलुटीच्या भ्रष्ट प्रकरणात मंत्री रावल हे आकंठ बुडाले आहेत आणि जनतेच्या पैशांची लूट करून सत्ता भोगणे हा भयंकर अपराध आहे. रावल यांचे वर्तन हे लोकप्रतिनिधीस शोभणारे नाही. अशी व्यक्ती मंत्रिमंडळात असले तर, महाराष्ट्राच्या अनतेने कोणता आदर्श बाळगावा? रावल यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे देता येतील. पण खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची 26 एकर जमीन हडपणाचा रावल यांचा प्रयत्न उच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. हे प्रकरणदेखील गुन्हेगारी स्वरूपाचेच आहे. सामान्य जनतेलाही सोडले नाही व राष्ट्रपतींनाही सोडले नाही. याचे इनाम म्हणून हे महाशय मंत्रीपदी आहेत काय?
मुंबईतील पीएमसी बँकेतील घोटाळ्यांविरोधात भाजपा रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून प्रकरणाचा तपास ‘ईडी’कडे सोपवला होता. जयकुमार रावल यांनी ‘रावल’ बँकेत केलेला गुन्हा त्याच पद्धतीचा आहे. पण ते भाजपा गोटात असल्याने त्यांना संरक्षण मिळाले आहे. रावल यांनी बँक लुटली. सामान्यांच्या पैशांची अफरातफर करूनही ते मोकळे व भाजपाचे प्रिय कसे? जयकुमार रावल यांनी बँकेच्या पैशांची अफरातफर करून पीएमएलए कायद्यांतर्गत येणारा मनी लॉण्डरिंगचा गुन्हा केल्याने हे संपूर्ण प्रकरण निष्पक्ष तपासासाठी ‘ईडी’कडे सोपवण्यात यावे आणि शेकडो बँक खातेदार तसेच ठेवीदारांना न्याय द्यावा, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.