महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेश होत आहे. या नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय असणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु आहे. हे विमानतळ कधीपासून सुरु होणार याविषयी देखील बरीच चर्चा रंगली होती. आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये याविषयी माहिती देण्यात आली.
नवी मुंबईतील उलवे येथे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरीत्या पार पडली आहेत. त्यामुळे तेथून एप्रिल, 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन आहे.
Ajit Pawar शिर्डी विमानतळावर नाईट लँडिग सुविधा सुरु होणार
1 हजार 367 कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना शिर्डी विमानतळाच्या मान्यता देण्यात आली असून ती कामे सुरु आहेत. सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच नाईट लँडिगची सुविधाही लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
अमरावती बेलोरा विमानतळ कधी सुरु होणार?
अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा सुरु करण्याचे नियोजन आहे.
रत्नागिरी विमानतळाच्या कामाला वेग
रत्नागिरी विमानतळाची 147 कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर आहेत.
गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरु आहेत.
अकोला विमानतळासाठी निधी उपलब्ध करणार
अर्थ संकल्प २०२५मध्ये अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.