आज चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफानलच्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघ खेळणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सलग ११ वा नाणेफेक गमावला आहे. (IND vs AUS Semifinal ) सामन्याचा नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकून दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून ऑस्ट्रेलिया संघात मात्र दोन बदल करण्यात आले आहेत.
सध्याच्या घडीला मर्यादित शषटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ बलाढ्य संघ दिसत आहे. मागच्या ३ आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने अवघा एक सामना गमावला आहे. ज्यामध्ये साखळी सामन्यांमध्ये एकही सामन्यात भारत पराभूत झालेला नाही. जो एक सामना गमावला, तो सामना होता २०२३ वन-डे वर्ल्ड कप फायनलचा. ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करून या २०२३ वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले होते. त्यामुळे आजचा संघ अटीतटीचा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आजच्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियारपेक्षा काही प्रमाणात मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघातील २०२३ वर्ल्ड कप विजेते प्रमुख खेळाडू संघाबाहेर आहे. कर्णधार पॅट कमिन्ससह मिचेल स्टार्क, मिचेल मार्श, जोश हेझलवूड, मार्कस स्टॉइनिस हे पाच खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा भाग नाहीत.
त्याचबरोबर भारतीय संघाने हायब्रीड मॉडेलमुळे आपले तीन्ही साखळी सामने दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळले आणि विजयही मिळवला. त्यामुळे मैदानावरील खेळपट्टीचा वातावरणाचा भारतीय संघाला चांगला अंदाज आहे. भारतीय संघात अनुभवी व नव्या खेळाडूंचे मिश्रण असून ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला नव्या चेहऱ्यांना घेऊन खेळावे लागत आहे.