राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा वाढता दबाव आणि राज्यातील नागरिकांमधील वाढलेला रोष पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुंडेंनी राजीनामा द्यावा, असं स्पष्ट केलं होतं. अखेर वैद्यकीय कारण पुढे करत (Beed Politics) धनंजय मुंडे यांनी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपावला. परळीचे आमदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जमीन घोटाळा, बलात्कार असे अनेक गुन्हे दाखल आहेत. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची पहिलीच वेळ आहे. परंतु त्यांचं वैयक्तिक आणि राजकीय आयुष्य हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेलं आहे. आपण त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
Dhananjay Munde राजकीय प्रवास
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील नाथरामध्ये 15 जुलै 1975 रोजी धनंजय मुंडे यांचा जन्म झाला. त्यानंतर राजश्री मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचा विवाह झाला. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे धनंजय मुंडे यांचे काका आहेत, त्यांनीच धनंजय मुंडेंना राजकारणात आणलं. 2007 पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. धनंजय मुंडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झाली होती. परंतु कालांतराने काका-पुण्यात तणाव निर्माण झाला. गोपीनाथ मुंडे यांनी मुलगी पंकजा मुंडे यांना 2009 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. हेच काका – पुतण्यातील संघर्षाचा प्रमुख कारण होतं.
Dhananjay Munde काका-पुतण्यात मतभेद
परळी नगरपरिषदेच्या वादामुळे काका-पुतण्यात फूट पडल्याचं सांगितलं जातंय. परळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष धनंजय मुंडे यांना त्याच्या समर्थकाला उमेदवारी द्यायची होती. यालाच गोपीनाथ मुंडेंनी विरोध केला. त्यामुळे धनंजय मुंडे आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले होते. 2012 मध्ये धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला अन् शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात परळी मतदारसंघातून लढत दिली. परंतु त्यावेळी धनंजय मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, 2019 च्या निवडणुकीमध्ये मात्र धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा 30 हजार मतांनी पराभव केला. धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात. 2014 मध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी सांभाळली होती. धनंजय मुंडे यांनी 2019, 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी मतदारसंघातून विजय मिळवला. ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री देखील होते.
Dhananjay Munde वादग्रस्त राजकीय अन् वैयक्तिक आयुष्य
धनंजय मुंडे यांचे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त राहिलंय. एका महिलेने 2021 मध्ये त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. हा आरोप नंतर मागे घेतला गेला, पण या घटनेमुळे मात्र मोठा गदारोळ झाला होता. त्यांच्या दुसऱ्या पत्नीने देखील धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर सतत आरोप होत आहेत. भांडण तंट्यापासून थेट धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यापर्यंत करुना शर्मा यांनी दोन हात केलेत.
संतोष देशमुख प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड टीका झाली. अखेर 3 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. मुंडेंनी राजीनामा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील मोठा दबाव होता. मुंडे हे एक प्रभावशाली मंत्री होते, त्यांच्या राजीनाम्यामुळे आता महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर काही परिणाम होतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संतोष देशमुख प्रकरणाव्यतिरिक्त धनंजय मुंडे यांच्या नावाची अनेक प्रकरणांत चर्चा आहे. पिक विमा घोटाळ्यात देखील धनंजय मुंडे यांचं नाव चांगलचं चर्चेत होतं. पुस शिवारातील शुगर मिल्स जमीन घोटाळा, बलखंडी देवस्थानचा शासकीय जमीन घोटाळा, तसेच 1988 साली मयत असलेल्या व्यक्तीच्या नावावर 2010 मध्ये संमतीपत्र करण्यासाठी इतर कोणाला उभं करुन तोतयागिरी केली, असं दोषारोपपत्र देखील धनंजय मुंडे यांच्याविरोधात न्यायालयात दाखल झालेलं आहे.
सरपंच देशमुख हत्या प्रकरण सध्या धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीवर गंभीर परिणाम करताना दिसत आहे. जर या प्रकरणात काही ठोस पुरावे सापडले, तर धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द संकटात सापडण्याची शक्यता नाकारण्यात येत नाहीये.