ठाकरे गटाचे माजी नेते किशोर तिवारी यांनी खळबळजनक दावा केला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे. (Aditya Thackeray) तसंच, याप्रकरणी आपण प्रयत्न केले नसते, तर आदित्य ठाकरेंना केव्हाच अटक झाली असती, असंही ते म्हणालेत. त्यांच्या या दाव्यानंतर आता राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
किशोरी तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी यांची जेव्हा इच्छा होईल, तेव्हा कोणत्याही क्षणी आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणात अटक होऊ शकते असे ते म्हणाले. तसेच कॅबिनेट मंत्री असताना आदित्य ठाकरे दिशा सालियान हिच्या घरी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी पार्टी केली. त्यानंतर त्या मुलीने आत्महत्या केली, असा दावाही त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना, आदित्य ठाकरेंना अटक होऊ नये म्हणून आपण प्रयत्न केले होते. मी माझे सगळे रिसोर्स वापरले होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंची अटक टळली. नाही तर आदित्य ठाकरेंना तेव्हाच अटक झाली असती, असेही त्यांनी सांगितलं. किशोर तिवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनामध्ये होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. दिशा सालियन प्रकरणासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. दिशा सालियनने आत्महत्या केली असून तिचा खून झाला आहे आणि यामध्ये आदित्य ठाकरे यांचा हात, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. प्रकरणी आता शोर तिवारी यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.