ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारताला गमवावी लागली होती. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 3-1 असा पराभव केला होता. या सिरीजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली पुरते (Virat Kohli) अपयशी ठरले होते. रोहित शर्माने तर या संपूर्ण मालिकेत फक्त 32 धावा केल्या. त्यामुळे रोहितवर प्रचंड टीका झाली होती. यानंतर विराट आणि रोहित दोघांचे क्रिकेट करियर लवकरच संपणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे.
भारतीय संघात (Team India) लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माचे कसोटी क्रिकेट लवकरच संपुष्टात येऊ शकते. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा होणार आहे. या दौऱ्यात पाच कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी निवडकर्ते रोहितला संघात घेण्याच्या मूडमध्ये नाहीत असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
जर रोहितला कसोटी क्रिकेटमधून डच्चू दिला गेला तर संघाचा कर्णधार कोण असेल असा प्रश्न विचारला जात आहे. रोहितच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) कर्णधार होईल याची दाट शक्यता आहे असा दावा काही मिडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. सध्या बुमराह दुखापतीने ग्रस्त आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतही तो खेळणार नाही. बरा होऊन तो संघात आल्यानंतर कसोटी संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे दिले जाऊ शकते. रोहित शर्मा आता सातत्याने अपयशी ठरत आहे. फलंदाजीत तर पुरता अपयशी ठरत आहे. कर्णधार म्हणूनही त्याची जादू आता दिसत नाही.
अशा परिस्थितीत रोहितला संघात ठेऊन करायचं काय असा प्रश्न निवडकर्त्यांसमोर आहे. त्यामुळेच आता त्याला हळूहळू का होईना पण संघा बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे. आता आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समिती रोहित शर्माबाबत काय विचार करणार, त्याला पुन्हा एखादी संधी दिली जाणार का या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत. परंतु, इंग्लंड दौऱ्यासाठी रोहितची निवड होणार नाही असाच दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.