विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे भाजपांतर्गत निवडणुकीने वेग घेतला आहे. भाजपाचा प्रदेशाध्यक्ष कोण होईल असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. भाजपाच्या विविध स्तरांवरील अध्यक्षपदांची निवड मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.
भाजपाचे संघटन पर्व सुरू आहे. 1 कोटी 51 लाख सदस्य जोडण्यासाठी राज्यात अभियान सुरू झाले आहे. यासाठी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि आम्ही महाराष्ट्रात फिरतोय. अभियान पूर्ण होईल असा विश्वास आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिले पर्व असेल. 3 लाख कार्यकर्त्यांना सक्रि सभासदत्व देतोय. बूथ अध्यक्ष आणि 12 पदाधिकारी देणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष निवडले जातील असे बावनकुळे म्हणाले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली मतदारसंघातून चौथ्यांदा बाजी मारली आहे. यंदा देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा जोराने सुरु होती मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. तर आता भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष संघटनेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
फरार कृष्णा आंधळेची संपत्ती होणार जप्त; संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट
यानंतर त्यांची राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होईल अशी चर्चा सुरू आहे. या पदासाठी सध्या त्यांचंच नाव आघाडीवर आहे. त्यांनी मंत्री म्हणूनही चांगलं काम केलं होतं. तसेच राजकीय नेते मंडळींचे वाद मिळवून पक्षाला स्थिरता देण्याचे कामही त्यांनी अनेकदा केले आहे. भाजपअंतर्गत वादांवर तोडगा काढण्याचेही काम चव्हाण करतात. त्यामुळे या पदावर त्यांना संधी मिळू शकते अशी शक्यता आहे.
भाजपात एक व्यक्ती एक पद असा नियम आहे. त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळेंकडे सध्या मंत्रिपद आहे. त्यामुळे आता त्यांना प्रदेशाध्यक्ष पद सोडावं लागणार आहे. बावनकुळे यांच्या जागी निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर रवींद्र चव्हाण पूर्णवेळ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होतील अशी शक्यता आहे. रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तसेच कोकणात भाजप मजबूत करण्यात रवींद्र चव्हाण यांचाही मोठा वाटा आहे.