विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेबाबत गोंधळाचं वातावरणही कायम आहे. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेतून वगळलं जाणार आहे. यासाठी पडताळणी सुरू झाली आहे. यानंतर कागदपत्रे आणि अन्य महत्वाच्या निकषांवर तपासणी होणार आहे. तर दुसरीकडे या योजनेतून पाच लाख लाभार्थी कमी झाले आहेत. यावर विरोधी पक्षांनी आक्रमक होत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या बनवेगिरीविरोधात महायुतीच्या नेत्यांवरच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
राजू शेट्टी पुढे म्हणाले, लाभार्थी संख्येत घट झाली. खरंतर हे असं होणारच होतं. लोकांच्याही हे लक्षात आलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी करदात्यांच्या पैशातून दिलेली ही लाच होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण, आनंदाचा शिधा या योजना सुरू करण्यात आल्या. मतदारांना दिलेली ही लाच होती. ती तेवढ्या काळापुरती होती, अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली.
राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही फक्त विधानसभा निवडणुकीत मते घेण्यासाठी हा बनाव करण्यात आला. आता या फसवणुकी विरोधात महायुतीच्या नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. या योजनेतून पाच लाख महिला गायब झाल्या आहेत. आणखी किती महिला गायब होतील हे देखील समोर येईलच असेही राजू शेट्टी म्हणाले.
Ladki Bahin Yojana पाच लाख लाभार्थी महिला अपात्र
लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जात होते. आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, विरोधकांकडून या योजनेवर टीका सुरू झाली. यामागे कारणही आहे. योजनेसाठी अर्ज करताना सरकारी यंत्रणांनी निकषांकडे लक्ष न देता सरसकट अर्ज मंजूर केले होते.
या योजनेच्या पात्रतेसाठी निकषांची चाळणी लावण्यात आली आहे. आदिती तटकरेंनी याची माहिती दिली. अपात्रतेच्या निकषांनुसार, संजय गांधी निराधार योजनेच्या 2,30,000 महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आलेय. याशिवाय, 65 वर्षांवरील 1,10,000 महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्याचं तटकरे म्हणाल्या. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या 1,60,000 अशा एकूण पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.