राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता आगामी निवडणुकांचे (Election) वेध लागतेत. स्थानिक स्वराज्य संस्था कधी होणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांचं एक विधान चांगलंच चर्चेत आलंय. पुढील दोन वर्षात राहिलेल्या सर्व निवडणुका होणार आहेत. या निवडणुका युद्ध आहेत, या युद्धासाठी शस्त्रसाठी गोळा करा, असं एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना म्हटलंय.
पुढील दोन वर्षामध्ये राहिलेल्या सगळ्या निवडणुका पार पडणार आहेत, या निवडणुका म्हणजे एक प्रकारचं युद्ध असणार. या युद्धाच्या तयारीसाठी युद्धसामग्रीसोबतच अस्त्र शस्त्राची आवश्यकता आहे, ते गोळा करा असं सूचक विधान एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यामध्ये बोलताना कार्यकर्त्यांना केलंय. मेळाव्यात खडसे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत यश मिळेल असं वाटत असताना अपयशाला सामोरं जावं लागलं. पण जनतेचा कौल मान्य करून पुढील निवडणुकांसाठी सज्ज झालं पाहिजे.
विधानसभेच्या निवडणुकानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध राजकीय पक्षांना लागलेत. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. शरद पवार गट सुद्धा कंबर कसून तयारीला लागल्याचं दिसतंय. आगामी निवडणुकांसाठी मजबूत होणं गरजेचं आहे. कारण राजकारणात कमजोर माणसाला किंमत नसल्याचं देखील एकनाथ खडसेंनी म्हटलंय.
दरम्यान कालच एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार, असे तर्कवितर्क लावले जात होते. मात्र एकनाथ खडसेंनी स्वत:चं या चर्चांना पूर्णविराम दिलाय. राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी कालच्या मेळाव्यात स्पष्ट केलंय. मतदारसंघातील विविध विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटलो. त्यांनी सुद्धा यावेळी अनुकूल प्रतिसाद दिला असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळालाय.