संत तुकोबारायांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे: ह.भ.प. गणेश महाराज फरताळे
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या (Maratha Seva Sangh Sambhaji Brigade) वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जयंती भक्ती शक्ती समूह शिल्प निगडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष मंचक जाधव, डॉ. मोहन पवार संतोष बादाडे, शशिकांत भोसले, वाल्मीक माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवकीर्तनकार ह.भ.प. गणेश महाराज फरताळे म्हणाले की संत तुकाराम महाराज हे निर्भीड संत व विद्रोही कवी होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विज्ञानवादी विचार हे खेडोपाड्यात पोहाचले पाहिजेत त्यांनी दाखवलेला मानवतावादी विज्ञानवादी दृष्टिकोन जनमाणसात पोहचायला हवा आणि यातून संत तुकाराम महाराज यांचे महान कार्य जनतेसमोर घेऊन गेले पाहिजे संत तुकोबारांयाची शिकवण ही समतेवर आणि मानवतेच्या प्रेमावर आधारित आहे.
०२ फेब्रुवारी १६०८ ही तुकाराम महाराजांची जन्म तारीख आहे म्हणून या दिवशी संत तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली पाहिजे, परंतु त्यांची पुण्यतिथी म्हणजे तुकाराम बीज उत्साहात साजरी केली जाते. जीवन जगण्याचा सरळ आणि सोपा मार्ग तुकाराम महाराज यांनी जगाला गाथेतून दिला. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा खरा संत असतो आणि तेच काम संत तुकाराम महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी केलं आणि अशा महान क्रांतिकारी संताच्या जयंतीचा विसर आज पडलेला दिसून येत आहे. परंतु या कार्याची सुरुवात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या कडून झाली याचं कौतुक फरताळे महाराजांनी केले.
यावेळी निरंजनसिंह सोखी, अनिल सावंत, शाहूराज कदेरे, पोपट काळे, भागिंदरे महाराज या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष वसंत पाटील, गणेश पवार, छावा संघटनेचे बिट्टू पाटील, महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अजय भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष लहूजी लांडगे, शहर उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, संघटक गणेश जवळकर, मर्दान घावटे, सुरेश भिसे, महेश कांबळे, उत्तम मोरवेकर, मोहीत साळुंखे, अनंत शेवाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा अश्विनी पाटील, उपाध्यक्ष संजीवनी कदम, सचिव शितल मोरे, भारत विठ्ठल दास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतीश काळे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल मिठे यांनी केले, आभार गणेश दहिभाते यांनी मानले.