विधानसभा निवडणुकीत मनसेने 128 जागांवर उमेदवार उभे करुन एकागी जागेवर विजय मिळवता आला नाही. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या अभिनंदनाचे आणि विधायक उपक्रमांना पाठिंबा असल्याचे ट्विट केले होते. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसेबाबत सकारात्मक आणि आशादायक वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी ‘सह्याद्री’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनसेविषयीचा सॉफ्ट कॉर्नर कायम असल्याचं दिसून आलं. त्यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला खुल्या दिलाने बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदाही झाला. पण विधानसभा निवडणुकीत आम्हाला राज ठाकरे यांची अडचण लक्षात आली. त्यांच्यासमोर मुख्य प्रश्न हाच होता की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रात आहे. पण त्यांच्या लोकांनी निवडणूक लढवलीच नाही तर तो पक्ष कसा चालणार? असंही फडणवीस म्हणाले.
आता विशेष अधिवेशन, हिवाळी अधिवेशन कधी सुरु होणार?
त्याचबरोबर आमच्याकडेही त्यांना देण्यासाठी जागा नव्हत्या. आम्ही तीन पक्ष होतो. ती वस्तुस्थिती समजून घेत राज ठाकरे यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. इतक्या मोठ्या प्रवाहाविरोधात लढून त्यांना चांगली मतं मिळाली, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिश्य चांगली मतं घेतली आहेत. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिकडे राज ठाकरे यांच्या पक्षाला सोबत घेण्याचा प्रयत्न करु, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.