काल (दि. 05 डिसेंबर) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) महायुतीची (Mahayuti) शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यानंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारचं अभिनंदन करत मराठा आरक्षणावरून सरकारला थेट इशारा दिला. नव्या सरकारचं अभिनंदन. आता नाटकबाजी बंद करायची अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची, असा इशारा जरांगेंनी दिला.
मनोज जरांगेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, कायद्याप्रमाणे त्यांनी शपथ घेतली. आमच्याकडून तिघांना शुभेच्छा आणि अभिनंदन. वैचारिक मतभेद असले तरी महाराष्ट्रात शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. त्यामुळं त्यांचे अभिनंदन. आता नाटकबाजी बंद करायची अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची, असं जरांगे म्हणाले.
CM होताच फडणवीसांनी बाहेर काढले खास पत्ते, गृह खात्यावर विचारताच जोरात हसले
पुढं ते म्हणाले, सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, मराठा आणि कुणबी एक आहे हा विषय मार्गी काढायचा. 2004 च्या अध्यादेशात दुरुस्ती करायची, यासह सात ते आठ मागण्या आम्ही या आधीच सरकारकडे केलेल्या आहेत. त्यांनी त्या मार्गी काढाव्यात, नाहीतर सरकारला पुन्हा एकदा मराठ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेलय आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू, असंही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस म्हणाले असतील तर चांगली गोष्ट आहे. लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, समाज तुमचं अभिनंदन करेल, असंही जरांगे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र, आम्हाला ओबीसींमधूनच आरक्षण हवं, या मागणीवर जरांगे आजही ठाम आहेत. आता ते पुन्हा आदोलनाच्या तयारीत आहेत.