राज्यात अजूनही सत्तास्थापनेचा पेच कायम (Maharashtra Politics) आहे. महायुतीचा विजय होवून भाजपला बहुमत मिळालंय. तरीदेखील मुख्यमंत्री कोण होणार? हे गुलदस्त्यात आहे. तर मागील दोन-तीन दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी गेल्याचं देखील समोर आलंय. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) गृहमंत्रीपदावर केलेला दावा भाजपने फेटाळून लावलाय.
महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना उपमुख्यंत्रिपद देण्याची शक्यता वर्तवली जातेय. यावरून आता मोठं राजकारण रंगलेलं दिसतंय. दरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका, असा इशारा संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलाय. यावेळी शिरसाट यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजपचं ठरलं! मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी 5 डिसेंबरला, एकनाथ शिंदेंना सूचक इशारा?
राज्यामध्ये चांगलं काम व्हावं, यासाठी आम्ही या खात्यांवर दावा केलाय. संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाने आमच्यावर लिंबू फिरवलं होतं, त्यावर उतारा करण्यासाठीच एकनाथ शिंदे दरेगावी गेले होते, असा टोला देखील संजय शिरसाट यांनी लगावला आहे. संजय राऊत यांना शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान करणं, एवढं एकच काम असल्याची टीका त्यांनी केलीय. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना ठाकरे पक्ष संपला, असा आरोप देखील शिरसाट यांनी केलाय. संजय राऊत यांच्यामुळेच शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसला. अजूनही राऊतांची बडबड सुरूच असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केलीय.
संजय शिरसाट म्हणाले की, आमच्यात समन्वयाचा कोणताही अभाव नाही. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून कोणती जागा कोणाला द्यायची? कोणते खाते कुणाला वाटप करायचे, याबद्दल संधी दिली जाईल. योग्य चर्चा होईल”, असाही विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय. एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दाढीवरून हात फिरवतात, तेव्हा तेव्हा राष्ट्रामध्ये मोठं काहीतरी घडतं. त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेता कामा नये. त्यांना हलक्यात घेण्याचं काम ठाकरेंनी केलं अन् आता त्यांची काय अवस्था आम्ही करून ठेवली हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय, असा सूचक इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय.