16.7 C
New York

Jitendra Awhad : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना वेगळीच शंका

Published:

बदलापुरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती आधी समोर आली होती. मात्र त्यानंतर त्याचा एन्काऊंटर झाल्याची बातमी समजली. पण हे सर्व संशयास्पद असल्याने विरोधकांकडून पोलीस आणि राज्य सरकारवर टीका होताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रसे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे. (Jitendra Awhad raised a different doubt in the case of Akshay Shinde encounter)

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी विरोधकांकडून टीका होत असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे. सोमवारी रात्री (23 सप्टेंबर) उशिरा ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाड म्हणाले की, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेच्या मुख्याधापकांची आणि विश्वस्तांची मुख्य चौकशी व्हायला हवी होती. पण अक्षय शिंदे याने त्यांच्याबद्दल काही माहिती देण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला संपवलं. शाळेचे अध्यक्ष तुषार आपटे आणि विश्वस्त उदय कोतवाल हे अद्यापही फरार आहेत, यामध्ये सगळंच गुपित आहे, अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केली आहे.

आव्हाड म्हणाले की, बलात्कार झाला तिथल्या प्रशासनाने म्हणजेच शाळेने पोलीस प्रशासनाला काही माहिती दिली नाही. नंतर शाळेतील सीसीटीव्ही गायब झाले. ज्या शाळेने गुन्हा लपवला त्या शाळेच्या संचालकांवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. गुन्हा लपवणे हा देखील गुन्हाच आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये उशिरा तक्रार दाखल करण्यात आली. पीडित पालकांना 13 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. अक्षय शिंदे या प्रकरणातला सगळ्यात मोठा साक्षीदार आणि गुन्हेगार होता. त्यामुळे त्याला फास्ट कोर्टातून फाशी मिळाल्यावर जनतेला आणि त्या मुलींनाही न्याय मिळाला असता. पण अक्षय शिंदे याच्याकडे काही अधिकची माहिती तर नव्हती ना? याच्यात कोणाला वाचवण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना? असे प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.

आताची मोठी बातमी ; अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून घेत स्वत:वर गोळी झाडली

Jitendra Awhad आव्हाडांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अक्षय शिंदेला मारण्यासाठी जे काही डोकं लढवलं गेलंय, ज्या काही युक्त्या केलेल्या आहेत त्या सगळ्या संशयास्पद आहेत. अशा गुन्ह्यातल्या आरोपींना व्यवस्थित सुरक्षित ठेवायला हवं होतं. कारण त्यांच्याकडे काय माहिती आहे, हे कोणालाच माहीत नाही. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर कोणालाच विश्वास नाही. ज्या पोलिसांवर गोळ्या झाडल्याचा दावा केला जात आहे, ते दोन पोलीस अधिकारी चालत रुग्णालयात गेले, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला.

Jitendra Awhad शिंदेच्या हाताला रिव्हॉल्व्हर लागलंच कसं?

एन्काऊंटरवर संशय व्यक्त करताना आव्हाड म्हणाले की, स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला असेल तर काही हरकत नाही, पण अक्षय शिंदेच्या हाताला रिव्हॉल्व्हर लागलंच कसं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच एका आरोपीच्या मागे चार-चार पोलीस असतात, असे असतानाही रिव्हॉल्व्हर काढून घ्यायला तो काय पैलवान आहे का? त्याला फाशी होणारच होती आणि व्हायलाच हवी होती. पण ते करण्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत. ते रस्ते बंद करून असं काही फिल्मी शुटआऊट आणि एन्काऊंटर करून तुम्ही स्वतःच्या सरकारबद्दलच संशय निर्माण करून घेतले आहेत, असा आरोप आव्हाड यांनी केला.

Jitendra Awhad गाडीमध्ये एन्काऊंटर होतो का ?

दरम्यान, गाडीमध्ये एन्काऊंटर होतो का? असा प्रश्न उपस्थित करत आव्हाड म्हणाले की, खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं. अक्षय शिंदे गाडीमधून पळत होता, उडी मारून पळून गेला म्हणून गोळी मारली, असे तरी सांगायचे. त्यामुळे सगळंच संशयास्पद आहे. एखादा आरोपी कितीही मोठा गुन्हेगार असो, पाच-पाच पोलीस बाजूला बसलेले असताना कोणाच्या कमरेच्या रिव्हॉल्व्हरला हात घालायची काय हिम्मत होईल? कोणालाच गोळी लागली नाही, हे सगळे सांगतात. पण ते सगळं खोटं आहे. कारण सगळे पोलीस अधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये चालत गेले. समोर स्ट्रेचर होते, त्यावर जाऊन झोपले, असा दावाही आव्हाड यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img