23.1 C
New York

Vijay Wadettiwar : वर्षा गायकवाडांना पोलिसांनी केलं स्थानबद्ध, वडेट्टीवार भडकले

Published:

मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्या दरम्यान आंदोलनाच्या तयारीत असलेले काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची पोलिसांनी सकाळपासूनच धरपकड सुरु केली आहे. शिवाय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना निदर्शनासाठी बाहेर पडण्यासाठीही मज्जाव केला आहे. तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना त्यांच्या घरीच स्थानबद्ध करुन ठेवले आहे. याच सर्व घटनांवर आता काँग्रेस नेते आणि विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी संताप व्यक्त केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, मोदी सरकार घटनेची पायमल्ली करत आहे. महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून संविधानक मार्गाने आंदोलन करत असताना लोकांना अटक करणे, घरासमोर पहारा देणे, घराबाहेर न पडू देणे, असे निर्णय हे सरकार घेत आहे. हे सरकार घाबरलेलं गोंधळलेलं असल्याचं दिसून येत आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने शांततेच्या मार्गाने निदर्शने करणे गुन्हा आहे का? त्या शिल्पकाराला अटक करता येत नाही. कमिशन खाणाऱ्यांना भीती वाटत आहे का? या सगळ्या गोष्टीचा उलगडा सरकारने केला पाहिजे. काँग्रेसच्या लोकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना अटक करणे ही हुकूमशाही आहे काय? असा सवाल विचारत ही दादागिरी आणि हुकुमशाही आम्ही अजिबात खपवून घेणार नसल्याचा इशारा देखील वडेट्टीवार यांनी यावेळी सरकारला दिला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, आमच्या खासदार वर्षा गायकवाड यांना घराबाहेर पडू दिल जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. आज त्यांचा पुतळा कोसळला उद्या तुम्ही देखील कोसळणार आहात, जर तुमच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली असेल तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले.


ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img