19.1 C
New York

Ajit Pawar : शिंदे अन् फडणवीसांच्या आधी अजितदादांनी गाठलं मालवण

Published:

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर राज्य सरकार अॅक्शनमोडमध्ये आलं आहे. या घटनेची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि सरकार मिळून संयुक्त तांत्रिक समितीची स्थापन केली आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकोट किल्ल्यावर भेट देऊन आढावा घेणं आवश्यक होते. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या आधी अजितदादांनी मालवणला जाऊन राज्यातील नागरिकांना मोठा शब्द दिला आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर अजितदादांनी (Ajit Pawar) पुढाकार घेत संधी साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Ajit Pawar Visited Rajokot Fort)

Ajit Pawar अजितदादांनी दिला शब्द

राजकोट किल्ल्यावर दाखल झाल्यानंतर अजितदादांनी किल्ला परिसराची पाहणी केली. तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनही देत याठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक उभारलं जाईल, असा शब्द दिला आहे. नवीन पुतळा उभारण्यासंदर्भात राम सुतार यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. राम सुतार यांनी अनेक मोठे पुतळे उभारले आहेत, त्यांना मोठा अनुभव आहे. सगळ्या गोष्टी बारकाईने बघून निर्णय घेतले जातील असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar कुणी पुतळा बांधला यावर वाद घालण्यात अर्थ नाही

पुतळा कोसळल्यानंतर हा पुतळा कुणी बांधला यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून, यावर बोलताना अजितदादांनी हा पुतळा नौदलानं केला की, सार्वजनिक बांधकाम विभागाने यात वाद घालण्यात काहीच अर्थ नसल्याचे सांगत पोलिसांनी चेतन पाटीलला अटक केली आहे. मात्र शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार आहे. मात्र, तो पळून पळून जाणार कुठं, देश सोडून तर जाऊ शकत नाही. त्याला लवकरच शोधून काढू. पुतळा उभारताना काय घडलं याची माहिती त्याच्याकडून घेतली जाईल असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar जनतेची माफी, मराठा आरक्षण अन् विधानसभा; अजितदादांनी संधी साधली

एकीकडे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. अद्यापही यावर राज्य सरकारने अंतिम तोडगा काढलेला नाही. त्यामुळे याचा फटका भाजप आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसल्याचे पाहण्यास मिळाले आहे. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, अद्यापही मराठा आरक्षणावर राज्य सरकारने तोडगा काढलेला नाही. त्यामुळे लोकसभेसारखा फटका महायुतीला विधानसभेलाही बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

त्यात आता संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. त्यामुळे या घटनेचाही विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच की काय अजितदादांनी लातूरमध्ये आयोजित जन सन्मान यात्रेच्या कार्यक्रमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देवासारखेच आहेत. त्यांचा पुतळा वर्षभराच्या आत कोसळणं धक्कादायक असल्याचे महाराष्ट्रातील 113 कोटी जनतेची जाहीर माफी मागितली.

त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे आणि फडणवीस घडलेल्या घटनेवर विरोधकांना उत्तर देण्यात व्यस्त असताना अजितदादांनी विधानसभांच्या तोंडावर पुढाकार घेत राज्याच्या जनतेची आणि मालवणला शिंदे-फडणवीसांच्या आधी भेट देत संधी साधल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, या सर्व गोष्टींचा अजितदादांना विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा होता का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img