पुणे
पुण्याच्या (Pune) बालगंधर्व रंगमंदिर चौकात शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केले आहे. बुधवारी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर (Shivaji Maharaj Statue) ठाकरे गट आणि राणेंमध्ये जो राडा झाला व त्यानंतर राणे यांनी धमकी देखील दिली होती, त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुण्यात आंदोलन केले आहे. यावेळी जमलेल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, रस्त्याच्या मधोमध बसून हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी नारायण राणेंना (Narayan Rane) अटक करा, अशी मागणीही करण्यात आली आहे. महाराजांच्या गडकिल्ल्यांचा सातबारा राणेंच्या बापाचा नाही असे म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राणेंवर टीका केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, काल नारायण राणे म्हणाले, इकडं यायचं नाही, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा हा नारायण राणेंच्या बापाचा नाही. हा सातबारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे, त्यामुळे नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्यात यावे आणि ही जबाबदारी फडणवीसांची आहे, जर ते गुन्हे दाखल करणार नसतील तर हे स्पष्ट दिसेल की, ते त्यांच्या हातच्या बाहुल्या आहेत असंही पुढे अंधारेंनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यात जी ठोकून काढण्याची भाषा केली जाते. कायदा सुव्यवस्था हातात घेतला जातो, नारायण राणेंकडून उद्दामपणाची आणि गुंडगिरीची भाषा केली जाते. पत्रकारांच्या हातातले बूम काढून घेतले जातात. त्यामुळे नारायण राणेंवर सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे, तर नारायण राणेंना अटक झाली पाहिजे, म्हणून आम्ही अल्टीमेटम देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत असंही यावेळी सुषमा अंधारेंनी सांगितलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, नारायण राणेंनी काल जी भाषा वापरली ती त्यांच्या संस्काराचा भाग आहे त्यांनी त्यांचे संस्कार आणि इतिहास दाखवला आहे त्यांनी काल बूम ओढला पत्रकारांशी असभ्य वागणे पोलिसांना दमदाटी करणे हे सर्व कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीसांमुळे सुरू आहे. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र हे कळसुत्री बाहुल्या आहेत. त्यांचे मुख्य सुत्रधार हे फडणवीस आहेत त्यांची इच्छा आहे का महाराष्ट्रात कायम सांप्रदायिक विभाजन झाले पाहिजे महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे. फडणवीस नावाच्या सुत्रधाराने उत्तर देण्याची गरज आहे. नारायण राणेंना फक्त राज्य अशांत करण्यासाठी ठेवले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.