23.1 C
New York

Ulhasnagar : मविआचे उल्हासनगरमध्ये तीव्र आंदोलन, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर संतापाचा उद्रेक

Published:

उल्हासनगर :- बदलापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. (Ulhasnagar) या पाश्र्वभूमीवर महाविकास आघाडीने या क्रूर घटनेच्या विरोधात आज राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र बंदला नकार दिल्याने, आघाडीने संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलन आयोजित केले होते. उल्हासनगर शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज काळे झेंडे आणि काळ्या फिती लावून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार, श्रीराम चौक परिसर आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भरून गेले होते. या आंदोलनात पुरुषांसह महिलांचा आणि युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. काळे झेंडे फडकवत आणि काळ्या फिती बांधून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मनातल्या असंतोषाची जाणीव यावेळी करून दिली. “लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित बहीण पाहिजे,” “चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशी द्या,” “उठ युवती जागी हो, संरक्षणासाठी शामिल हो,” अशा तीव्र घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.

लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत कुठे? राज ठाकरेंचा सवाल

उबाठा गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी या आंदोलना दरम्यान महायुती सरकारवर कडवट टीका केली. त्यांनी म्हटले, “महायुती सरकारच्या बाजूने काम करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र बंद विरोधात सुप्रीम कोर्टात जाणे हे अत्यंत निंदनीय आहे. त्यांच्या या कृतीने सरकारचा हात मजबूत करण्याचे प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट दिसते.” तसेच “स्वातंत्र्यपूर्व काळात असे कोर्ट असते, तर आपल्याला कधीच स्वातंत्र्य मिळाले नसते.” अशी टिका देखील त्यांनी यावेळी केली.

उल्हासनगरमध्ये झालेल्या या तीव्र निषेध आंदोलनाने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाने समाजात महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. या आंदोलनामुळे उल्हासनगर शहरात वातावरण तापले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरतेने घेण्याची आवश्यकता महाविकास आघाडीने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

महाविकास आघाडीच्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरणात संतापाचे वादळ उठले आहे. सरकारच्या विरोधात उठलेल्या या आवाजाला कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महिलांच्या अधिकारांसाठी आवाज उठवण्याचे महत्त्व या आंदोलनाने पुन्हा अधोरेखित केले आहे. उल्हासनगरमधील या आंदोलनामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणावर काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img