गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अनेकदा आंदोलने केली, मात्र अद्याप आरक्षणाचा तिढा सुटला नाही. दरम्यान, आता शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंनी (Sambhaji Bhide) मराठा आरक्षणबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. वाघ आणि सिंहांने आरक्षण मागावे का? मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठं घेऊन बसला? असं विधान त्यांनी केला.
संभाजी भिडेंनी सांगलीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ येत्या 25 ऑगस्टला सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पुकारण्यात येणार असल्याचे संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोलकाता बलात्कार प्रकरणापासून राज्यातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
नितेश राणेंच्या जन आक्रोश मोर्चाला इंदापुरात विरोध
त्यांना मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना भिडे म्हणाले की, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. याचे उदाहरण देताना त्यांनी सांगलीतील कमांडो ट्रेनिंग कॅम्पचा उल्लेख केला. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये नि:शुल्क प्रवेश दिला तर वाघ आणि सिंहांनी तिथं प्रवेश घ्यावा का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गुरूडाने प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लबमध्ये मासोळी प्रवेश घेईल का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल भिडेंनी उपस्थित केला.
पुढं ते म्हणाले, मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठं मागता? सिंहांनी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्या दिवशी मातृभूमीचे भाग्य उजळून जाईळ. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपलं दुर्दैव आहे, असंही भिडे म्हणाले.
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्टला कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी भिडे यांनी केली. शिवप्रतिष्ठानच्या वतीने हा बंद पुकारल्याचे त्यांनी सांगितले. बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराविरोधात भारत सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.