23.1 C
New York

Uddhav Thackeray : पूर्वी लोक ‘मातोश्री’वर यायचे आणि आता..; खासदार शिंदेंची बोचरी टीका

Published:

नवी दिल्ली

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या गाठीभेटी घेतली. यात प्रामुख्याने काँग्रेस (Congress) नेत्यांच्या गाठीभेटीवर भर दिसला. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी बोचरी टीका केली. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. शिंदे बोलत होते.

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, पूर्वी लोक मातोश्रीवर यायचे आता दिल्लीत येऊन तीन दिवस वेळ मागत बसाव लागत आहे. महाराष्ट्राने हे पहिल्यांदा चित्र पाहिलं असेल अशा तिखट शब्दात खासदार शिंदे यांनी टीका केला. ही लाचारी आहे. ही परिस्थिती पहिल्यादांच राज्याने पाहिली. भेटायची इच्छा नसताना फोन करून भेटायला बोलावलं हे काँग्रेसच्या काही नेत्यांनी मला खासगीत सांगितलं. यांची विचाराधारा बदलली आहे हिंदुत्व सोडलं आहे. ज्यांच्या मतावर हे निवडून आले त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम यांनी केले आहे असे टोलाही खासदार शिंदे यांनी लगावला.

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांना भेटण्यासाठी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे. मात्र आज उद्धव ठाकरे आणि उबाठा गट स्वतःच्या स्वार्थासाठी तीन दिवस दिल्लीत येऊन थांबले. मला मुख्यमंत्री करा, असे काँग्रेसजवळ गाऱ्हाणे घालण्यासाठी ते दिल्लीत थांबले होते. आजवर महाराष्ट्राने एवढी लाचार परिस्थिती पहिली नाही, अशी घणाघाती टीका डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, उबाठाने बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून दिली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, हिंदुत्व सोडले, वैचारिक भूमिकाच राहिली नसल्याने उबाठा खासदारांनी गुरुवारी संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावेळी संसदेतून पळ काढला, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. २०१९ ला हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि २०२४ ला ज्यांच्या मतांवर हे निवडून आले त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उबाठाने केले. फक्त स्वार्थासाठी ते केवळ राजकारण करत असल्याचे कालच्या भूमिकेतून स्पष्ट झाले. वक्फ बोर्ड विधेयकावर तुम्ही भूमिका का मांडली नाही, असा सवाल डॉ. शिंदे यांनी उबाठा नेत्यांना यावेळी विचारला.

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून आले आणि नंतर सत्तेच्या खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. आता पुन्हा लोकसभेत एका विशिष्ट समाजाच्या मतांनी हे निवडून आले आणि याच समाजाच्या सुधारांसाठी संसदेत एक महत्वाचे विधेयक मांडण्यात आले तेव्हा त्यांचे सर्व नऊ खासदार पळून गेले. मुस्लिम समाजाने तुम्हाला भरभरुन मतदान केले मात्र या समाजाशी संबधित वक्फ बोर्ड विधेयकावर बोलण्याऐवजी पळून गेले. सर्व पक्षाचे नेत्यांबरोबरच शिवसेना, इतर पक्षांच्या नेत्यांनी तसेच विरोधी पक्षाने या विधेयकावर भूमिका मांडली मात्र वैचारिक गोंधळामुळे उबाठा खासदारांनी सभागृहातून पळ काढला आणि विधेयकावर बोलणे टाळले, असे डॉ. शिंदे म्हणाले. या पळपुटेपणामुळे आपण कोणावर विश्वास ठेवला हे मुस्लिम समाजाने लक्षात घ्यायला हवे, असे डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मविआतील नेते दररोज नवीन नावे घोषित करतात आणि उबाठा दिल्लीत येऊन लाचारी करतात, असा टोला त्यांनी लगावला. उबाठा मुख्यमंत्री असताना अडीच दिवस देखील मंत्रालयात गेले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी, बहिणींसाठी आणि युवकांसाठी काही केले नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर टीका करतात मात्र त्यांच्या शाखांमध्ये बॅनर लावून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे मोठ्या प्रमाणात फॉर्म भरतात, अशी टीका डॉ. शिंदे यांनी केली. राज्यातील महायुती सरकार हे सर्वसमावेश विचार करणारे आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी काम आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तरुणांसाठी लाडका भाऊ योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img