23.1 C
New York

Jayant Patil : ‘महायुतीचे काळे कारनामे’; जयंत पाटलांनी जाहीर केली ‘शिवस्वराज्य यात्रा’

Published:

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेत ‘शिवस्वराज्य यात्रा’ची (Shivswarajya Yatra) घोषणा केली आहे. ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू होईल अशी माहिती देताना या यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल असे जयंत पाटील यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेचा टिझर व लोगोही प्रसिद्ध केला. यावेळी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक तथा खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते तथा आमदार अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते तथा आमदार राजेश टोपे व सुनील भुसारे तसेच आमदार रोहित पवार आदी नेते उपस्थित होते.

याबाबत सविस्तर बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेलेले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत. हे सर्व सुरू असताना राज्यकर्ते हतबलपणे बसले आहेत. त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार अशी माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांतून फिरणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार. तसेच ९ ऑगस्ट हा दिवस निवडण्याचा उद्देश म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा या दिवशी ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच त्या दिवशी जागतिक आदिवासी दिवस असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रामध्ये रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या पायवाटेनं आणि आदर्शाने महाराष्ट्र राज्य चालवण्यासाठी राज्यातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार आहे असे जयंत पाटील म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्र व राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. आता महाराष्ट्रातील बहाद्दर जनतेने महायुती सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार घाबरून, वेगवेगळ्या योजनांचा भडीमार करत आहे तसेच सरकारी तिजोरी मोकळी करत आहे. सरकार ज्या घोषणा करत आहे ते जनतेलाही पटत नाही असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img