1 कोटी 14 लाख वाहनांचा टप्पा समृद्धी महामार्गाने (Samruddhi Highway) 17 जुलैला पार केला आहे. तसेच एमएसआरडीसीच्या तिजोरीमध्ये 826 कोटी रुपये त्यातुन आतापर्यंत जमा झाले असल्याची माहिती मिळत आहे. नागपूर ते मुंबई हा प्रवास सात तासांत पार करण्यासाठी सुमारे 55 हजार कोटी खर्च करून प्रवेश नियंत्रित असा समृद्धी महामार्ग उभारला जात आहे. या महामार्गाची लांबी 701 किमी असणार आहे. त्यामधील नागपूर ते इगतपुरी हा मार्ग यापूर्वीच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु झाला आहे. सद्याच्या काळात या महामार्गावरून दररोज जवळपास 20 हजार वाहने धावत आहेत. 8 लाख 22 हजार 166 वाहनांनी मे महिन्यात समृद्धीवरून प्रवास केला आहे. त्यामुळे मे महिन्यात या महामार्गावरून सर्वाधिक वाहतूक झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला असून त्यातील हा मार्ग वाहतुकीसाठी नागपूर ते शिर्डी सुरु करण्यात आला होता. पहिल्या महिन्यात या महामार्गावरून 2 लाख 20 हजार वाहनांनी प्रवास केला होता. त्यातून एमएसआरडीसीच्या तिजोरीत 13 कोटी 17 लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता, तर या महामार्गाने ऑगस्ट 2023 मध्ये दरमहा 5 लाख वाहनांचा टप्पा पार केला होता.
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी ‘PMPML’चे कर्मचारी आक्रमक
डिसेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा या मार्गावरून वाहनांनी 7 लाखांचा टप्पा पार केला. तसेच आता या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा महामार्ग जसा येण्या जाण्यासाठी योग्य आणि सोयीस्कर आहे, तसेच यावर आतापर्यंत अनेकांनी जीव देखील गमावला आहे. त्यामध्ये अनेक लोकांचे गाडीवरील नियंत्रण सुटणे, चालकाला झोप लागणे, टायर फुटणे, दोन वाहनांमध्ये योग्य अंतर न असल्याने, भरधाव वेगात गाडी चालविणे अशा कारणांमुळे अपघात झाले असून आतापर्यंत 123 गंभीर अपघात झाले आहेत. तर 213 जणांनी आपला जीव गमावल्याची माहिती मिळत आहे.
तसेच समृद्धी महामार्गावरून एक कोटीहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. हा महामार्गाचा शेवटचा इगतपुरी ते आमने टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर नागपूर ते मुंबई अशी थेट जोडणी मिळणार असून, समृद्धीवरील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होईल अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे.