21 C
New York

Narayan Rane : नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Published:

मुंबई

मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधील पहिले अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प (Budget) सादर केला होता. या अर्थसंकल्पावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका केली होती. यावर माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. भाजप प्रदेश कार्यालय नरिमन पॉईंट मुंबई येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

नारायण राणे म्हणाले की, लोकसभा निवडणुकांनंतर देशात मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आले. या सरकारने देशाचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पापेक्षा तीन लाख कोटींनी जास्त आहे. यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल. या अर्थसंकल्पाचे सर्वांनी स्वागत केलं. मात्र आमच्या विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे. अर्थसंकल्प म्हणजे काय याचा अभ्यास विरोधकांनी करायला हवा. उद्धव ठाकरे यांनी जे मत व्यक्त केलं आहे, त्याला मी आज उत्तर देणार आहे. उद्धव ठाकरेंकडून दुसरी अपेक्षा करणे चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंचा अभ्यास अर्थसंकल्पावर नाही हे त्यांनी स्वतःच एकदा सभेमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेला काही अर्थ नाही” असं भाजप खासदार नारायण राणे म्हणले.

नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना चांगल्या भाषेत बोलता येत नाही. त्यांच्या काळातले बजेट माझ्याकडे आहे. त्यांनी काय दिवे लावले ते समजेल. आता साडे चार लाखांचं बजेट राज्याकडे आहे. यांना त्यावेळी कळलं का कितीची तूट आहे? हा आमचा सर्व समावेशक अर्थ संकल्प आहे. उद्धव ठाकरे यांना बजेट वाचायचं असेल तर मी टिपण देईन. प्रत्येक योजनेंतर्गत एक बजेट आहे. राज्याला योजना दिल्या जातात. सर्व योजना राज्यात आहेत आणि मोदी सरकारने दिल्यात. अज्ञानी राहुल गांधी बजेटवर बोलले. आम्ही बजेट मांडून लोकांना लाभ दिलाय. तुम्ही तर राजकोषीय तूट वाढवून दाखवली, असंही नारायण राणे यांनी नमूद केलं.

नारायण राणे म्हणाले, जे कंत्राटदार सोडून गेले त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि नवीन टेंडर काढावे आणि रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा. यासाठी मी पत्र व्यवहार देखील केला आहे, असंही नारायण राणे यांनी सांगितलं. शिवाय मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचे नारायण राणे यांनी स्वागत केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मागे भाजप आहे. ते एकटे नाहीत. जे कोणी त्यांच्यावर टीका करत आहेत त्यांचा बोलवता धनी दुसरा कोणी तरी आहे. जरांगे यांचे नाव मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हते. जरांगे यांचे वैयक्तिक मत आहे, मराठा समाजाचे नाही. जरांगे यांचा मागे कोणीतरी दुसरं ताकद लावत आहे, असंही नारायण राणे यांनी नमूद केले.

नारायण राणे म्हणाले की, विधानसभेत भाजपने किती जागा लढवाव्यात यावर वरिष्ठ मंडळी जो काय योग्य तो निर्णय घेतील. यावर माझे काहीही म्हणणं नाही. परंतु मला असे वाटते की भाजपने 288 जागा लढवायला हव्या आहेत. राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु त्यांचा हा निर्णय मी आता पहिल्यांदाच ऐकत असल्याचेच ते म्हणाले. त्यासोबतच ते कोणत्या जागा लढवणार, हा त्यांचा स्वतःचा प्रश्न असल्याचेही ते म्हणालेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img