26.6 C
New York

Pravin Darekar : जरांगे-पाटलांनी मविआची सुपारी घेतलीय दरेकरांचा हल्लाबोल

Published:

मुंबई

मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात अहंकार आला आहे. त्यांच्या आंदोलनामागील छुपा अजेंडा काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर, मराठा समाजासमोर आला आहे. मराठा समाजाच्या भावनांवर स्वार होऊन त्यांनी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सुपारी घेतली आहे, असा हल्लाबोल भाजपा (BJP) गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेत दरेकर यांनी जरांगे पाटील यांनी केलेल्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, जरांगे पाटील यांच्यात अहंकार आला आहे. या आंदोलनामागील त्यांचा छुपा अजेंडा काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मराठा समाजासमोर आले आहे. त्यांचे राजकीय महत्वकांक्षा, सत्ताकारण लपून राहिलेले नाही. मराठा समाजाला वेठीस धरून, मराठा समाजाच्या भावनांवर स्वार होऊन महाविकास आघाडी आणि काही जणांची जरांगे यांनी सुपारी घेतल्याचा आरोपही दरेकरांनी केला. तसेच जरांगेंचा खेळ आता संपायला आलाय म्हणून त्यांचे मानसिक संतुलन ढासळू लागलेय आणि ते वाटेलते बोलायला लागलेत. जरांगे म्हणालेत उपोषण झाल्यावर बघून घेतो मी त्यांचे आव्हान स्वीकारलेय त्यांना काय बघायचेय ते बघून घ्यावे, असे प्रतिआव्हान दरेकर यांनी दिले.

दरेकर पुढे म्हणाले की, असल्या प्रकारचे बालबोध चॅलेंज मराठा समाजाच्या जीवावरच करत होतात परंतु आता उपोषण सोडलात ना, बरं झाले आम्हाला थोडा आनंद झाला. तुमची प्रकृती नीट राहावी, मैदानात उतरून आपल्याला लढता यावे यासाठी ठणठणीत व्हा. उपोषण करू नका. मला माहिती मिळाली की जवळच्या लोकांनी सांगितलेय आता उपोषणाकडे सगळे पाठ फिरवताहेत, ना लांबून सरकारचे मंत्री येणार, ना कुणी समर्थक पहिल्यासारखे येणार. ५-६ वेळा उपोषणे झाली, अशी जगात पाहिली नाहीत. या आंदोलनात मराठा समाजाविषयासंदर्भात जरांगे यांनी किती वेळ घालवला? दुसऱ्याची कुंडली काढण्याआधी स्वतःचीही कुंडली दुसरा जमवत असतो याची जाणीव ठेवा. तुमच्या कसल्याही धमक्यांना भीक घालत नाही, असेही दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, मराठा समाजाचा जरांगेंवरुन विश्वास उडाला आहे. त्यांची सुरुवातीची भाषा कुणबी नोंदी संदर्भात होती. त्यात देखील सरकारने पुढाकार घेतला. त्यानंतर सगेसोयरेचा विषय आला. त्यावर देखील सरकारने सकारात्मकता दाखवली. त्या दृष्टीने कामे देखील सुरू झालेली आहेत. परंतु हा विषय धगधगत राहिला पाहिजे. विधानसभेला महाविकास आघाडीला कशी मदत होईल याची नियोजनबद्ध काळजी घेण्याचे काम जरांगे करताना दिसताहेत. जरांगे यांच्या चर्चेच्या फेऱ्या या आंदोलनातील मागणीबाबत व्हायला पाहिजे. परंतु त्यांच्या फेऱ्या राजकीय भाषेच्या होताहेत. आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हापासून राजेश टोपे, राजेश टोपेचा कारखाना, नंतर आलेले नेते या सगळ्यावरून संदर्भ त्याठिकाणी झालेल्या बैठका. जरांगे तुमच्या नौटंकीला महाराष्ट्रातील मराठा समाज भुलणार नाही. माझ्यावर कुणी बोलायचेच नाही आणि बोलले तर त्याला व्यक्तिगत स्तरावर टार्गेट करायचे चालू होते.

दरेकर पुढे म्हणाले की, जरांगेंना सत्तेची आस लागली आहे. जरांगेंनी महाविकास आघाडीची सुपारी घेतलीय हे त्यांच्या विधानातून स्पष्ट होतेय. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे का? हा सवाल जरांगे महाविकास आघाडीच्या नेत्यांना का विचारत नाहीत. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर का बोलता? भाजपालाच का सवाल करता? यातून एकच स्पष्ट होते की, तुम्ही मराठा समाजाच्या भावनांचा जो काही खेळ मांडला होतात ते तुमच्या दुकानदारीसाठी हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

दरेकर पुढे म्हणाले की, जरांगे यांच्या मनात, पोटात जे होते ते आज बाहेर आलेय. त्यांना सत्तेची आस लागलेली आहे. कुणाला निवडून आणायचे आणि कुणाला पाडायचे हा विषय कशाचा आहे. मराठा समाजाने पाठबळ दिले याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काहीही बोलायला अधिकार दिलेला नाही. खुर्ची खेचायची आहे तर या निवडणुका लढा, पक्ष काढा किंवा महाविकास आघाडीला संलग्न घटक पक्ष व्हा, राज्याचे मुख्यमंत्री व्हा आणि या मुख्यमंत्र्यांना जे शक्य नाही ते तुम्ही करा. तुमच्या आंदोलनामागील सत्य आता लोकांच्या समोर यायला लागलेय, असे खडेबोलही दरेकरांनी जरांगेंना सुनावले.

तसेच त्यांची अपेक्षा आहे त्यांना जेलमध्ये टाकावे. कारण पब्लिसिटी कमी होतेय. पुन्हा जेलमध्ये गेले की गर्दी, लखलखाट, प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. म्हणून त्यांचा अट्टाहास असेल. परंतु जेलमध्ये कोण कशासाठी जाते यासाठी संविधानाने दिलेले निकष आहेत. कोणाला जेलमध्ये जायचेय म्हणून कुणी टाकत नसतो. कोर्टावर विश्वास हवा. फडणवीस कोर्टाला डायरेक्शन देऊ शकतात का? मुळात कोर्टाने नोटीस बजावलेली आहे. परंतु डोक्यात अहंकाराची एवढी हवा गेलीय पोलीस, सरकार, कोर्ट मानायला तयार नाहीत. आमची भुमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट केलीय दुसऱ्याच्या ताटातील काढणार नाही. मराठ्यांना आरक्षण देण्याचे काम सरकारने केलेय. आता ज्या भरत्या झाल्यात त्यात मराठा समाजाची मुले १० टक्के आरक्षणाप्रमाणे समाविष्ट झालेली आहेत. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याची भुमिका सरकारची आहे. जरांडगे ज्यांच्यासाठी राजकीय पोळी भाजत आहेत त्यांना लाभ मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

दरेकर म्हणाले की, जरांगे यांच्या आंदोलनाला कोण फूस देत आहे हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील जबाबदार मोठे नेते हे यामागे असल्याचे लपून राहिलेले नाही. जरांगे यांची भाषा ज्याप्रकारे चालली आहे त्यानुसार विरोध कुणाला आणि समर्थन कुणाला आहे हे स्पष्ट दिसतेय. लोकसभा निवडणुकीवेळी मराठा समाजाला त्यांच्या भूमिकेचा अंदाज नव्हता म्हणून भोळाभाबड्या समाजाचा विश्वास होता परंतु आता जरांगेंनी मराठ्यांचे प्रश्न सोडले राजकीय झालेत याचे दुःख मराठा समाजाला आहे. जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण नेम चालवतोय हे स्पष्ट झाल्याचेही दरेकरांनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img