26.6 C
New York

Eknath Shinde : राज्य सरकारची लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Published:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते आषाढी एकादषीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा पार पडली. यावेळी त्यांनी विठुरायाकडे ”आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत” असे साकडे घातले आहे. दरम्यान, एकादशीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात आयोजित ‘कृषी पंढरी’ या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या योजनेंतर्गत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्याची मोठी घोषणा केली.

Eknath Shinde राज्य सरकार तरुणांना स्टायपंड देणार

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, “या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे. या योजनेअंतर्गत आपले तरुण कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपंड देईल.”अशी महत्वाची घोषणा त्यांनी केली.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्र्यांबरोबर यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

शेतकरी सुखी राहू दे; मुख्यमंत्री शिंदेंचं विठूरायाला साकडं

एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यात शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, कामगारांचं सरकार आहे. हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल ते पाहतंय. आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये, म्हणजेच वर्षाला १८,००० रुपये दिले जातील. तसेच त्यांना दर वर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जातील. या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील.”

Eknath Shinde अजित पवारांकडूनही वारकऱ्यांना वंदन

आषाढी एकदशीनिमित्त बा पांडुरंग आणि वारकरी माऊलींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन करत भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशीला बा पांडुरंगभेटीच्या ओढीनं शेकडो किलोमीटर पायी चालून पंढरपूरला पोहचलेल्या वारकरी माऊलींच्या तसंच महाराष्ट्राचं आराध्य दैवत बा पांडुरंगाच्या चरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केलं असून “राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे, शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची सुबत्ता येऊदे, राज्यातली मायमाऊली आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊदे, समाजातली एकजूट, बंधुत्वाची भावना कायम राहूदे, महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे,” असं साकडंही अजित पवार यांनी बा पांडुरंगाला घातलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img