26.6 C
New York

Vidhan Parishad Election : अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट, अनेक चर्चांना उधाण

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकानंतर (Lok Sabha elections) राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) 11 जांगासाठी आज आमदारांचं मतदान सुरू आहे. दुपारी 1.30 वाजेपर्यंत 246 मतदान झाले असून या मतदानावेळी राजकीय नेत्यांच्या हसतखेळत गप्पा पाहायला मिळाल्या आहेत. मतदान प्रक्रिया सुरु असताना एक वेगळंच चित्र माध्यमांनी टिपलं. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकमेकांसमोर आले. त्या दोघांमध्ये काही सेकंद संवाद झाला. एकमेकांच्या हातात हात देत दोघांमध्ये चर्चा झाली. तर, संजय राऊत आणि अजित पवारांचं हस्तांदोलनही अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे. दररोज एकमेकांवर टीकेची झोड उठवणाऱ्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) चक्क उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गळ्यात हात घातल्याचं पाहायला मिळालं. आता दोघांत काय खलबतं झाली, यावर चर्चा रंगली आहे.

सकाळचा भोंगा म्हणून नेहमीच शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर महायुतीच्या नेत्यांकडून टीका केली जाते. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडूनही नाव न घेता संजय राऊतांवर असाच हल्लाबोल केला जातो. मात्र, जेव्हा हे नेते समोरासमोर येतात तेव्हा हसत खेळत हस्तांदोलन करतात, एकेमकांशी गप्पा मारत असतात, हे वास्तव आहे. विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान होत असून या मतदानावेळी असे अनेक प्रसंग, क्षण पाहायला मिळाले आहेत. अजित पवार यांचा संजय राऊतांसमवेतच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला असून अजित दादांनी संजय राऊतांना दोन हातांनी हस्तांदोलन केल्याचं दिसून आलं. तर, जयंत पाटील यांच्याशी काही क्षण थांबून अजित पवारांनी गुप्तगू केल्याचं दिसून आलं. विधानपरिषदेतील या दोन्ही भेटीवरुन राजकीय अर्थ लावले जात आहेत. मात्र, ही केवळ अनावधानाने झालेली भेट असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.

महायुतीला 11 पैकी 10 जागा जिंकणे सोपे आहे, परंतु क्रॉस व्होटिंग झाले तर तीन महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. शरद पवार यांच्याकडे 12 आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 तर काँग्रेसकडे 38 आमदार आहेत. या 12 उमेदवारांपैकी भाजपचे पाच उमेदवार सुरक्षित वाटतात, ते म्हणजे पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर. महाविकास आघाडीमधून काँग्रेसचा 1 उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव सहज विजयी होऊ शकतात. जयंत पाटील यांना जिंकायचे असेल तर त्यांच्यासाठी मतांचे व्यवस्थापन करावे लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img